
मुंबई - वंदे मातरम गीताच्या गायनावरून राज्यात राजकीय वातावरण पेटलेले असताना आता याप्रकरणी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी कॉंग्रेस आमदार अमीन पटेल, अस्लम शेख, अबू आझमी आणि रईस शेख यांच्या कार्यालयासमोर वंदे मातरम समूह गायन करण्याचा इशारा दिला होता, अखेर भाजप युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी शुक्रवारी या तीनही आमदारांच्या कार्यालयाबाहेर वंदे मातरम समूह गायनाच्या कार्यक्रमाची रणनीती आखली असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली.
वंदे मातरम या गीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये ही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या निमिताने देशभरात जल्लोषाचे वातावरण असताना काँग्रेसच्या आणि समाजवादी पक्षाच्या काही आमदारांनी याला विरोध करणारे वक्तव्य केले होते. याचा तीव्र शब्दात मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी निषेध व्यक्त केला होता. त्याच वेळी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या तीन आमदाराच्या मतदार संघात वंदे मातरमचे समूहगान करण्याचा इशारा दिला होता. पार्श्वभूमीवर आता भाजप युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे.
या प्रकरणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांकडून शुक्रवारी कुलाबा, मुंबादेवी, मालाड आणि मानखुर्द या चार ठिकाणी वंदे मातरम गीताचे समूह गायन करण्याची आखणी सुरु केली असल्याची माहिती पुढे आली आहे. या चारही ठिकाणची जबाबदारी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली असल्याचे कळते . या कार्यक्रमात भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर तिवाना हे देखील सामील होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता वंदे मातरम गीताच्या गायनावरून शुक्रवारी मुंबईत राजकीय आखाडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

No comments:
Post a Comment