
मुंबई - मतदार याद्यातील घोळाचा मुद्दा गाजत असतानाच याद्यांची प्रभागनिहाय फोड करतानाही त्यात सत्ताधा-यांना अनुकूल ठरेल असे असंख्य झोल करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाने आणि मनसेने केला आहे. मतदार याद्यामधील या घोळाची चौकशी करून या त्रुटी दूर करण्याची मागणी ठाकरे बंधूंनी निवडणूक आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आ. आदित्य ठाकरे आणि मनसेच्या बाळा नांदगावकर यांनी राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन हे पत्र आयोगाला दिले.
मतदारयाद्याची प्रभागनिहाय फोड करताना त्यात राजकीय सोय बघून मतदारांची नावं एका प्रभागातून दुस-या प्रभागात फिरवण्यात आली आहेत, असा आक्षेप शिवसेना ठाकरे गटाने व मनसेने घेतला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना पत्र लिहून या घोळाकडे लक्ष वेधले आहे. प्रभाग निहाय मतदारयादी विभाजनातील गंभीर त्रुटी व गोंधळ दूर करून निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूकप्रक्रिया राबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.
राज ठाकरेंनी आपल्या पत्रात प्रामुख्याने सहा भागाकडे लक्ष वेधले आहे. निवडणूक आयोगाने शेवटची मतदार यादी ही ३०/१०/२०२४ रोजी प्रकाशित केली. त्यानंतर नवीन यादी प्रकाशित झाली नाही. निवडणूक आयोगाच्याच नियमाप्रमाणे दर वर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात नवीन यादी प्रसिद्ध होते आणि त्यानंतर दर तीन महिन्याला सुधारित यादी प्रसिद्ध होते. या वर्षात असे का केले नाही? संकेतस्थळावर नवीन मतदार नोंदणी, वगळली गेलेली नावं आणि बदल यासह जे प्रसिद्ध केलं आहेत ती फक्त औपचारिकता म्हणून केलं आहेत असं म्हणायला पूर्ण वाव आहे कारण इतका त्याच्यात गोंधळ आहे. कारण नवीन सुधारित यादीत ते कोण आहेत स्त्री का पुरुष ? त्यांचा पत्ता काय ? याचा कोणताही तपशील नाही.
महापालिका निवडणुकांसाठी आधी मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची तारीख ६ नोव्हेंबर २०२५ ठरली होती आणि ती पुढे ढकलत २० नोव्हेंबरला निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली. त्यावर हरकती घ्यायला केवळ ८ दिवस दिले आहेत. याद्यांवर आक्षेप नोंदवायचे तर त्याची प्रक्रिया पण तुम्ही किचकट करून ठेवली आहे. आक्षेप नोंदवताना, आक्षेप घेणा-यानेच त्या मतदाराचा आधारकार्ड किंवा इतरं पुरावा मागितला आहे. जवळपास १० लाख दुबार मतदार आहेत. मग जर इतके मतदार दुबार आहेत त्यांना शोधून, त्यांची नावे वगळण्यासाठी ७ ते ८ दिवस कसे पुरतील? त्यासाठी किमान २१ दिवस हवेत. आक्षेप घेण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाच्या पदाधिका-यास एकत्रित आक्षेप घेण्याची मुभा असली पाहिजे.निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर बोलताना आदित्य ठाकरे यांनी जात-धर्म पाहून याद्यात फेरबदल केले गेले असल्याचा आरोप केला.

No comments:
Post a Comment