महाराष्ट्राला बंगाल होण्यापासून रोखायचे असेल तर समाजातील सर्व घटकांनी एकत्र यायला हवे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 December 2025

महाराष्ट्राला बंगाल होण्यापासून रोखायचे असेल तर समाजातील सर्व घटकांनी एकत्र यायला हवे


मुंबई - कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते आज मालाड-मालवणी येथे के. इ. एम. नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली म्हणून या रुग्णालयाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल असे नाव देण्याची सूचना मंत्री लोढा यांनी केली.

गेली अनेक वर्षे रखडलेले हे रुग्णालय महायुती सरकारच्या कार्यकाळात वेगाने पूर्ण करण्यात आले. पूर्वी छोट्या प्रमाणात असलेले हे केंद्र आता मोठ्या स्वरूपात नागरिकांच्या सेवेत रुजू होणार असून येथे एकाचवेळी साधारण ४०० रुग्णांवर उपचार करता येतील. अत्याधुनिक उपकरणे आणि पायाभूत सुविधांमुळे येथील नागरिकांना उच्च दर्जाची आरोग्यसेवा मिळणार आहे.

उदघाटन कार्यक्रमात अतिक्रमण आणि घुसखोरीबाबत कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिलेली प्रतिक्रिया - 
प्रसंगी बोलतांना मंत्री लोढा म्हणाले "बांग्लादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना महाराष्ट्रात जागा नाही, तसेच सरकारी जमिनींवरील अतिक्रमणालाही मोकळीक दिली जाणार नाही. जनतेच्या मालकीच्या सरकारी जमिनी पुन्हा परत घेणे ही कायदेशीर जबाबदारी आहे. त्यामुळे अतिक्रमण हटवण्याच्या माझ्या कामावर दबाव आणण्यासाठी किंवा धमक्या देण्यासाठी कोणीही पुढे आले, तरी मी मागे हटणार नाही—उलट, धमकी मिळाली तरी मी पुन्हा-पुन्हा येथेच येईन आणि लोकांच्या सेवेसाठी उभा राहीन" 

"राज्यकारभारात प्रत्येकाला आपापली राजकीय जबाबदारी पार पाडण्याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. आज माझे कर्तव्य आहे की सरकारी जमिनींचे व्यवस्थापन पारदर्शकपणे करावे, अतिक्रमण हटवावे आणि त्या जमिनी समाजोपयोगी कार्यासाठी उपलब्ध करून द्याव्यात. हा मुद्दा ना राजकीय आहे, ना धार्मिक; ही केवळ कायद्याची अंमलबजावणी आणि मुंबईच्या सुव्यवस्थेची गरज आहे. मालवणीपुरतेच नव्हे, तर संपूर्ण मुंबईतील सरकारी जमिनी अतिक्रमणमुक्त करणे हे माझे उद्दिष्ट आहे" असे देखील कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्पष्ट केले. 

"घुसखोरांबाबत नीती स्पष्ट आहे—जबरदस्तीचे पाहुणे नकोत. अवैधरीत्या देशात राहणाऱ्या रोहिंग्या-बांग्लादेशी घुसखोरांना भारतीय नागरिकांसाठी असलेल्या योजनांचा लाभ मिळणार नाही. अशा घुसखोरीकडे दुर्लक्ष केले तर कसाबसारखे दहशतवादी पुन्हा उदयास येऊ शकतात, मुंबई पुन्हा बॉम्बस्फोटांच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ शकते. मुंबईच्या सुरक्षेच्या मुद्यावर कसलीही तडजोड चालणार नाही. घुसखोर मुंबईच्या सुरक्षेत सर्वात मोठी बाधा आहे. जर महाराष्ट्राला बंगाल होण्यापासून रोखायचे असेल तर समाजातील सर्व घटकांनी आता एकत्र येणे ही काळाची गरज आहे" असे देखील मंत्री लोढा यांनी कार्यक्रमात बोलतांना सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS