महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायींची गैरसोय होऊ नये म्हणून पाणीकपात रद्द - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 December 2025

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायींची गैरसोय होऊ नये म्हणून पाणीकपात रद्द


मुंबई - भांडुप जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचे काम प्रस्तावित आहे. या कारणाने ३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून ४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत एकूण १४ प्रशासकीय विभागांमध्‍ये पाणीपुरवठ्यात १५ टक्‍के कपात लागू करण्याचे नियोजन होते. तथापि, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी मुंबई महानगरात येणार असल्याने त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून १५ टक्के पाणीकपात रद्द करण्यात आली आहे.

तानसा धरणातून भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी २७५० मिलीमीटर व्यासाची तानसा जलवाहिनी बदलण्याचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत नियोजित आहे. जुनी जलवाहिनी काढून नवीन जलवाहिनी अंथरण्‍याकामी काही कामे प्रस्‍तावित आहेत. त्‍यासाठी साधारणतः २४ तासांचा कालावधी आवश्‍यक आहे. या कामकाजामुळे भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रास होणा-या पाणीपुरवठ्यामध्ये अंदाजे १५ टक्‍के घट होणार आहे. याचा परिणाम म्‍हणून मुंबई शहर विभागातील ए, सी, डी, जी दक्षिण, जी उत्‍तर विभाग ; पश्चिम उपनगरातील एच पूर्व, एच पश्चिम, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्‍तर, आर दक्षिण, आर मध्य विभाग तसेच पूर्व उपनगरा‍तील एल आणि एस विभाग अशा एकूण १४ प्रशासकीय विभागांना होणा-या पाणीपुरवठ्यात १५ टक्‍के कपात केली जाणार होती. त्यामुळे बुधवार, दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून गुरूवार, दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत पाणीपुरवठ्यात १५ टक्‍के कपात लागू राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. 

तथापि, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी दरवर्षी मुंबई महानगरात येत असतात. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून १५ टक्के पाणीकपात रद्द करण्यात येत असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS