
मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ (BMC Election) च्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत शुक्रवार, २ जानेवारी २०२६ रोजी संपली. या मुदतीपर्यंत एकूण ४५३ नामनिर्देशन पत्रे मागे घेण्यात आली असून, सुधारित आकडेवारीनुसार आता १,७०० उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.
महापालिका निवडणूक कार्यक्रमानुसार मंगळवार, २३ डिसेंबर ते मंगळवार, ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत ११,३९१ नामनिर्देशन पत्रांचे वितरण करण्यात आले होते. त्यापैकी अंतिम दिवशी २,५१६ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले. बुधवारी, ३१ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या छाननीत १६७ नामनिर्देशन अर्ज अवैध ठरले, तर २,२३१ अर्ज वैध ठरविण्यात आले.
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवार, २ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ असा वेळ निश्चित करण्यात आला होता. या कालावधीत २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून एकूण ४५३ उमेदवारांनी माघार घेतली.
शनिवारपासून चिन्ह वाटप -
शनिवार, ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपासून उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. चिन्ह वाटप प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी त्याच दिवशी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे.
विभागनिहाय उमेदवार संख्या -
महापालिकेच्या विविध प्रशासकीय विभागांमध्ये उमेदवारी माघारीनंतर उमेदवारांची संख्या निश्चित झाली असून काही विभागांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. एम पूर्व, जी उत्तर, के पश्चिम, आर दक्षिण यांसारख्या विभागांमध्ये उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे.
महापालिका निवडणुकीच्या पुढील टप्प्यात आता प्रचाराला वेग येणार असून, चिन्ह वाटपानंतर राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवार पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहेत.

No comments:
Post a Comment