
शिर्डी कोपरगाव (दिलीप गायकवाड) - कोपरगाव शहर व तालुक्यात सुरू असलेले विविध अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत, अन्यथा कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या उद्घाटन प्रसंगी धरणे आंदोलन व काळे झेंडे दाखवण्यात येतील, असा इशारा लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने ॲड. नितीन पोळ यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी पोलीस अधीक्षकांना लेखी निवेदन सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कोपरगाव शहर व ग्रामीण भागात बेकायदेशीर दारू विक्री, मटका, जुगार, गांजा, चरस, कुत्ता गोळी, ऑनलाईन लॉटरी, चकरी, तसेच रेशनचा गहू-तांदूळ, वाळू आणि गोमांसाची अवैध विक्री खुलेआम सुरू आहे. या अवैध धंद्यांना काही राजकीय नेते तसेच पोलीस व महसूल अधिकाऱ्यांचा आशीर्वाद मिळत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या बेकायदेशीर धंद्यांमुळे परिसरात गुन्हेगारी वाढली असून सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शालेय विद्यार्थिनींना त्रास देण्याचे प्रकार घडत असून महिलांच्या दागिन्यांवरही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून डल्ला मारला जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
ॲड. पोळ यांनी पोलीस अधीक्षकांकडे अवैध धंदे तात्काळ बंद करणे, संबंधितांवर कठोर कारवाई करणे, तसेच या धंद्यांना संरक्षण देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांचे निलंबन करण्याची मागणी केली आहे. या मागण्यांची पूर्तता न झाल्यास २ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

No comments:
Post a Comment