
मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची जागतिक स्तरावर अधिक प्रभावी ओळख निर्माण व्हावी, यासाठी शहराच्या प्रमुख प्रवेशद्वारांवर भव्य प्रवेशद्वार आणि आकर्षक क्लॉक टॉवर उभारावेत, अशी मागणी महापौर रितू तावडे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महानगरपालिका आयुक्तांना पत्र पाठवून आगामी अर्थसंकल्पात आवश्यक तरतूद करण्याची विनंती केली आहे.
महापौरांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, मुंबईत दररोज देश-विदेशातून लाखो पर्यटक आणि व्यावसायिक येत असतात. शहरात प्रवेश करताना त्यांना मुंबईची वेगळी आणि भव्य ओळख जाणवावी, यासाठी पाचही प्रमुख मार्गांवर आकर्षक प्रवेशद्वार उभारणे गरजेचे आहे.
यामध्ये पूर्व द्रुतगती महामार्ग, मुलुंड चेक नाका, मुलुंड–ऐरोली मार्ग, वाशी–मानखुर्द मार्ग तसेच पश्चिम द्रुतगती मार्गावरील दहिसर चेक नाका येथे सौंदर्यीकरण, सुशोभीकरण आणि क्लॉक टॉवर उभारण्याचा प्रस्ताव आहे.
या प्रकल्पामुळे शहराच्या प्रवेशबिंदूंना वैशिष्ट्यपूर्ण रूप प्राप्त होईल तसेच मुंबईची ओळख अधिक भव्य आणि जागतिक स्तरावरील महानगर म्हणून दृढ होईल, असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला आहे.

No comments:
Post a Comment