
मुंबई - दक्षिण मुंबईतील पश्चिम रेल्वे वरील महत्वाची स्थानके लवकरच अतिक्रमण मुक्त आणि सुशोभित होणार आहेत. मुंबई सेंट्रल, ग्रांट रोड आणि चर्नी रोड स्थानकात लवकरच सरकते जिने बसवण्यात येणार असून स्थानकांचे सुशोभीकरणही करण्यात येणार आहे. कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्थानिकांसह आज चर्चगेट येथील पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात मुख्य व्यवस्थापक विजयकुमार यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. या भेटीनंतर लवकरच स्थानिकांच्या तक्रारी नुसार योग्य कार्यवाही करण्यात येणार असल्याचे कुमार यांनी सांगितले.
राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतील मुंबई सेंट्रल,ग्रँट रोड आणि चर्नी रोड स्थानक परिसरातील विविध समस्यांबाबत पश्चिम रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक विजयकुमार यांची भेट घेतली. मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी घुसखोरी वाढत असून अनधिकृत फेरीवाल्यांचा विळखा पडला आहे. यातले अनेक फेरीवाले बांगलादेशी रोहिंगे असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्थानक परिसरात अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करावी. तसेच रस्त्यावर अनेक ठिकाणी गर्दुल्ले वावरताना दिसत आहेत. त्यामुळे प्रवाश्यांना आणि पादचार्यांनाही विनाकारण याचा उपद्रव सहन करावा लागत आहे. स्थानिकांच्या या समस्या गांभीर्याने घेऊन पश्चिम रेल्वेने याबाबत त्वरित कारवाई करावी अशी मागणी यावेळी मंत्री लोढा यांनी कुमार यांच्याकडे केली. त्याचबरोबर चर्नी रोड स्थानक ते गिरगावला जोडणारा पूल रखडला असून यातही रेल्वेने सहकार्याची भूमिका घ्यावी. त्याचबरोबर स्थानकात सरकते जिने बसवून वयोवृद्ध प्रवाश्यांना लवकरात लवकर सुविधा उपलब्ध करून द्यावी असेही मंत्री लोढा यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पश्चिम रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक विजयकुमार यांनी समस्या जाणून घेतल्यानंतर यावर लगेचच अहवाल तयार करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत. हा अहवाल आल्यानंतर यावर त्वरित कार्यवाही करून प्रवाश्यांच्या समस्यांचे निराकरण करू असे सांगितले. स्थानकांच्या सुशोभीकरणाच्या प्रस्ताव ही प्रलंबित असल्याचे त्यांनी मान्य केले असून लवकरात लवकर स्थानकाचा परिसर स्वच्छ आणि सुशोभित करू असे आश्वासन दिले आहे. या बैठकीला कौशिक शाह यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

No comments:
Post a Comment