
मुंबई - मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या Kishori Pednekar यांनी मिठी नदी गाळ सफाई कामाची पाहणी करत प्रशासनावर जोरदार टीका केली. कामात विलंब, कंत्राटदारांवरील सवलती आणि नियोजनाच्या अभावावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
पेडणेकर म्हणाल्या की, गाळ सफाईसाठी तीन कंत्राटदार नेमले असले तरी एका कंत्राटदारालाच दोन कंत्राटे देण्यात आली आहेत. “म्हणजे प्रत्यक्षात दोनच कंत्राटदार काम करत आहेत,” असा आरोप त्यांनी केला. तसेच काम उशिरा सुरू झाल्यामुळे १२ दिवसांचा गॅप कसा भरून काढणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
त्या पुढे म्हणाल्या की, गाळ सुकण्यासाठी किमान ४८ तासांचा अवधी लागतो, मात्र अवकाळी पावसामुळे कामात आणखी अडथळे निर्माण होऊ शकतात. “कंत्राटदारांनी काम वेळेत पूर्ण केले नाही, तर आम्ही गप्प बसणार नाही. मुंबईकर सगळं पाहत आहेत,” असा इशाराही त्यांनी दिला.
महापालिकेच्या कारभारावर टीका करताना त्यांनी म्हटले की, “कोणी काही बोललं की महापौर स्पष्टीकरण द्यायला येतात. यातच संपूर्ण कार्यकाळ जाणार का?” कंत्राटदारांना ‘गुढघ्यावर आणलं’ असा दावा केला जातो, मात्र तो अटी शिथिल करूनच का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
माजी मंत्री Aaditya Thackeray यांच्या कार्यकाळात मार्च महिन्यातच पाहणी होत असे, असे सांगत त्यांनी सध्याच्या कामाच्या विलंबावर टीका केली.
महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर बोलताना पेडणेकर म्हणाल्या की, “आमच्या काळात ६०० कोटींची तूट भरून १०-१५ वर्षांत ९१ हजार कोटींचा बजेट उभा केला. आता त्याची काय अवस्था झाली आहे?”
गारगाई प्रकल्पावरही टीका -
गारगाई प्रकल्पाबाबत त्यांनी विचारले की, खर्च किती होणार आणि किती झाडे तोडली जाणार? “मुंबईला गोडं पाणी देण्याच्या नावाखाली पर्यावरणाचा बळी दिला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.
कोकण रेल्वे बदलावर प्रश्न -
रत्नागिरी-दादर पॅसेंजर ट्रेनच्या मार्गात बदल होण्याच्या चर्चांवर त्यांनी प्रतिक्रिया देत, “कोकणवासीयांवर राग काढला जात आहे का?” असा सवाल उपस्थित केला.
‘लाडकी बहीण’ योजनेवर टीका -
‘लाडकी बहीण’ योजनेच्या KYC मुदतवाढीवर टीका करत त्यांनी म्हटले की, “२०२८ पर्यंत हीच प्रक्रिया चालणार. हे निवडणूक जिंकण्याचे तंत्र आहे.” “फक्त १५००-२१०० रुपयांवर थांबू नका, ‘आवळा देऊन कोवळा काढण्याचा’ प्रकार सुरू आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.
मिठी नदी गाळ सफाईपासून ते विविध प्रकल्प आणि योजनांपर्यंत, Kishori Pednekar यांनी प्रशासनाच्या कामकाजावर अनेक मुद्द्यांवरून थेट हल्लाबोल केला असून, आगामी काळात या मुद्द्यांवरून राजकारण अधिक तापण्याची शक्यता आहे.


No comments:
Post a Comment