
मुंबई | जेपीएन न्यूज -
महाराष्ट्रातील शिधापत्रिका व्यवस्थेत मोठा डिजिटल बदल करत राज्य सरकारने QR Code आधारित Smart Ration Card (स्मार्ट शिधापत्रिका) वितरणाची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे 1.70 कोटी पात्र कुटुंबांना मोफत स्मार्ट शिधापत्रिका देण्यात येणार असून, नागरिकांना अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि सुलभ सेवा उपलब्ध होणार आहे.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिक जिल्ह्यातील येवला येथे स्मार्ट शिधापत्रिकेच्या प्रतिकृतीचे अनावरण करण्यात आले. पुढील तीन वर्षांत संपूर्ण राज्यात ही योजना टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे.
राज्य सरकारच्या माहितीनुसार, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना (AAY आणि PHH) तसेच APL-शेतकरी योजनेतील शिधापत्रिकाधारकांना QR Code आधारित स्मार्ट शिधापत्रिका पूर्णपणे मोफत दिली जाईल. या कार्डमुळे लाभार्थ्यांची माहिती डिजिटल स्वरूपात सुरक्षित राहील, शिधापत्रिका खराब होण्याची किंवा हरवण्याची समस्या कमी होईल आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पारदर्शकता वाढेल.
या प्रकल्पाची प्रायोगिक अंमलबजावणी नंदुरबार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये करण्यात येणार आहे. त्यानंतर प्राप्त अनुभवाच्या आधारे आवश्यक सुधारणा करून संपूर्ण महाराष्ट्रात स्मार्ट शिधापत्रिका योजना लागू केली जाणार आहे.
सरकारने सांगितले की, हा प्रकल्प मुख्यमंत्री यांच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग असून, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या संकल्पनेनुसार 'स्वर्गीय अजितदादा पवार लोककल्याण स्मार्ट शिधापत्रिका वितरण मोहीम' पुढील तीन वर्षे राबविण्यात येणार आहे.
राज्यातील लाखो नागरिकांना यामुळे रेशन वितरणाशी संबंधित सेवांचा लाभ अधिक वेगाने आणि डिजिटल पद्धतीने मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


No comments:
Post a Comment