
मुंबई | JPN NEWS -
महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) मोहिमेचा १४ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजेपर्यंतचा आढावा मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी जाहीर केला आहे. या आकडेवारीनुसार, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांमध्ये SIR प्रक्रिया राज्याच्या तुलनेत अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे दिसून आले आहे.
राज्यातील ९ कोटी ७८ लाख ५४ हजार ४९ मतदारांपैकी ६ कोटी ७१ लाख ४५ हजार २७२ (६८.६२ टक्के) मतदारांना आतापर्यंत Enumeration Forms (EFs) वितरित करण्यात आले आहेत. त्यापैकी २ कोटी २१ लाख ५८ हजार ३८२ (२२.६४ टक्के) फॉर्मचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यात ७८ लाख ३० हजार ११ मतदारांपैकी केवळ २३ लाख ४४ हजार ४०३ (२९.९४ टक्के) मतदारांपर्यंत फॉर्म पोहोचले असून, त्यापैकी फक्त ३ लाख ६४ हजार ५४८ (४.६६ टक्के) फॉर्मचे डिजिटायझेशन करण्यात आले आहे. फॉर्म वितरणात मुंबई उपनगर राज्यात सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे.
मुंबई शहर जिल्ह्यात २५ लाख ५५ हजार ४९९ मतदारांपैकी ९ लाख ७७ हजार ५९६ (३८.२५ टक्के) मतदारांना फॉर्म वितरित करण्यात आले आहेत. यापैकी २ लाख ५० हजार १७१ (९.७९ टक्के) फॉर्मचे डिजिटायझेशन झाले आहे.
दरम्यान, फॉर्म वितरणात हिंगोली जिल्हा ९९.९० टक्क्यांसह राज्यात अव्वल ठरला असून, त्यानंतर सिंधुदुर्ग (९७.०७ टक्के), बुलढाणा (९६.४८ टक्के) आणि गोंदिया (९६.२७ टक्के) यांचा क्रमांक लागतो.
डिजिटायझेशनमध्ये चंद्रपूर जिल्हा ५२.४५ टक्क्यांसह राज्यात प्रथम असून, यवतमाळ (४८.४७ टक्के) आणि रत्नागिरी (४७.१८ टक्के) पुढील क्रमांकावर आहेत.
याउलट, डिजिटायझेशनमध्ये ठाणे जिल्हा केवळ ४.०७ टक्क्यांसह राज्यात सर्वात मागे असून, त्यापाठोपाठ मुंबई उपनगर (४.६६ टक्के), पालघर (७.०४ टक्के) आणि मुंबई शहर (९.७९ टक्के) यांचा क्रमांक लागतो.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये SIR प्रक्रिया वेगाने सुरू असताना, मुंबई महानगर प्रदेशातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांतील संथ प्रगतीमुळे अंतिम मुदतीपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आव्हान निवडणूक यंत्रणेसमोर उभे राहिले आहे.


No comments:
Post a Comment