DATE- 20 Feb.. 2012 ' आठवलेंना वापरून दाखवलं....... ! ' - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

DATE- 20 Feb.. 2012 ' आठवलेंना वापरून दाखवलं....... ! '

Share This

DATE- 20 Feb.. 2012
' आठवलेंना वापरून दाखवलं....... ! '
       नुकताच महानगर पालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून शिवसेना भारतीय जनता पार्टी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या महायुतीला सर्वात जास्त म्हणजेच १०६ जागा मिळाल्या आहेत . यामुळे महायुती सत्ता स्थापन करेल यात शंका घेण्याचे कारण नाही. या निवडणुकीत शिवसेनेला ७५, काँग्रेसला ५०, भाजपला ३१, मनसेला २८, राष्ट्रवादीला १४, समाजवादी पक्षाला ९, जागा मिळाल्या असून या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या ७, कॉंग्रेसच्या २१, जागा घटल्या आहेत तर मनसेच्या चौपट जागा , भाजपच्या 4 जागा, समाजवादी पक्षाच्या २ जागा वाढल्या आहेत.
   महायुतीला या सत्तेपर्यंत पोहोचवण्यात मोठी भूमिका पार पाडणारे रिपाइचे रामदास आठवले यांना मात्र या निवडणुकीमध्ये चांगलाच फटका बसला आहे. निवडणूक जाहीर झाल्या पासून सतत आम्हाला १५ ते २० जागा मिळतील, आमचे उमेदवार जिंकून आणण्यासाठी १० - १० शाखाप्रमुख , विभाग प्रमुख प्रचारात उतरवू आणि जिकून आणू असे वचन उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. आम्हाला काँग्रेसवाल्यांनी २० वर्षे वापरले पण आम्हाला सत्ते पासून दूर ठेवले आम्ही याचा बदला घेण्यासाठी महायुती मध्ये सामील झालो आहोत. आमच्या कार्यकर्त्यांना सत्तेत वाटा मिळावा म्हणून युती बरोबर आम्ही हातमिळवणी केली आहे. असे आठवले नेहमी पत्रकाराना सांगत होते.निवडणुकीचा निकाल लागल्यावर मात्र चित्र उलट असल्याचे दिसले. 
   शिवशक्ती-भीमशक्ती प्रयोगामुळेच मुंबईतील शिवसेनेचा गड राखण्यात युतीला यश आले असले तरीही २९ जागा लढवून फक्त धारावीच्या एका जागेवर विजय मिळाल्याने रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षात मोठ्या नाराजीचे वातावरण आहे. मात्र एप्रिल महिन्यात रामदास आठवलेंचा खासदारकीची लॉटरी लागण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे. 
   लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघातील पराभव जिव्हारी लागल्यामुळे सामान्य कार्यर्कत्यांना सत्तेत वाटा देण्याच्या नावाखाली आठवले यांनी मुंबईत शिवशक्ती-भीमशक्ती हा नवीन प्रयोग केला. त्यामागे महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला धडा शिकविणे हाच उद्देश होता. तो सफल झाल्याचे निकालांनी दाखवून दिले. रिपब्लिकन पक्षाला मानणारी मते काँग्रेस आघाडीला न जाता महायुतीच्या पारड्यात पडली. पण काही वॉर्डांत शिवसेना-भाजपची मते आमच्या उमेदवारांना मिळाली नाहीत, असे काही रिपब्लिकन नेत्यांचे म्हणणे आहे. 
   रिपब्लिकन पक्षाला महायुतीने २९ जागा सोडल्या होत्या. त्यापैकी दोन जागा आठवले यांनी ज्येष्ठ कवी नामदेव ढसाळ यांच्या दलित पँथरला दिल्या. उर्वरित २७ ठिकाणी उमेदवार निवडताना गफलत झाली. त्याशिवाय महापालिका निवडणूक अत्यंत खचिर्क झाल्यामुळे अनेक वॉर्डांत पैशाअभावी उमेदवारांना सशक्तपणे लढता आले नाही. महायुती जिंकली याचा आनंद असला तरी पक्षाची कामगिरी ठीक न झाल्यामुळे नाराजीचे वातावरण आहे, अशी प्रतिक्रिया मुंबईचे अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी दिली आहे.
   या निवडणुकीमध्ये महायुतीमधील पक्षांनी आज पर्यंत जे काँग्रेसने केले त्याप्रमाणेच रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना तुच्छ मानत आपली मते इतर पक्षाला देवून रिपब्लिकन उमेदवार पाडण्याचे काम केले आहे. शिवसेनेने ज्या प्रमाणे केलेल्या कामाची जाहिरात "करून दाखवलं!" अशी केली. रिपब्लिकन पक्षाचे नेते जेव्हा या निवडणुकीमधील अपयशाचे कारणे शोधतील तेव्हा त्यांना मते मिळवण्यासाठी काँग्रेस प्रमाणेच युतीने सुद्धा 'आठवलेंना वापरून दाखवलं.......!' असेच म्हणावे लागेल.
अजेयकुमार जाधव मो.९९६९१९१३६३    

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages