आदिवासी सेनेचा 30 रोजी संसदेवर "बोंबाबोंब' मोर्चा
गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांची सोडवणूक करण्यासाठी अखिल भारतीय आदिवासी सेनेतर्फे येत्या 30 ऑगस्टला संसद भवनावर "बोंबाबोंब' मोर्चा काढण्यात येणार आहे. संसदेप्रमाणेच कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानांसमोर हे आंदोलन करण्यात येईल, असे संघटनेचे अध्यक्ष दि. ना. उघाडे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. राज्यात व देशात मागासवर्गीय, अल्पसंख्याक, दलित समाजावर वाढते अत्याचार होत असून शेतकरी, शेतमजूर, विधवा, अपंग, यांच्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अकार्यक्षम मंत्र्यांना काढून टाकावे, अशी मागणी सोनिया गांधी व शरद पवार यांच्याकडे करण्यात येईल. दादर रेल्वेस्थानकाला चैत्यभूमी नाव द्यावे, चैत्यभूमी स्मारकासाठी इंदू मिलची साडेबारा एकर जमीन मोफत द्यावी, चैत्यभूमी हे राष्ट्रीय स्मारक जाहीर करावे, अशाही त्यांच्या मागण्या आहेत.


No comments:
Post a Comment