मंत्रालयाचा चेहरा बदलणार
राज्याचा कारभार चालविणारे मंत्रालय दोन महिन्यांपूर्वी भीषण आगीत जळाले आणि राज्याच्या कारभाराची गती मंदावली. त्यामुळे मंत्रालयाचे जळालेले तीन मजले अवघ्या चार महिन्यांत उभे करण्यात येणार असून हे तीन मजले वातानुकूलीत असतील. तसेच त्याला कॉर्पोरेट लूकही दिला जाईल.
मंत्रालयाला लागलेल्या आगीत चौथा , पाचवा आणि सहावा असे तीन मजले जळून भस्मसात झाले. मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री , राज्याचे मुख्य सचिव यांच्यासह अनेक मंत्र्यांची आणि सचिवांची दालने या मजल्यांवर असल्याने ' पॉवरस्टेशन ' असलेले हे मजले पुन्हा कशा रीतीने उभारायचे यावर मागील दोन महिन्यांत बराच खल झाला. खासगीकरणातून मंत्रालय मेकओव्हरचा प्रस्ताव बासनात गुंडाळला गेला आहे. विनाकारण टीकेचे धनी नको , म्हणून सरकारने स्वतःच मंत्रालयाचा विकास करण्याची भूमिका घेतलेली आहे. राज्य मंत्रिमंडळाने यासाठी प्रारंभी ८० कोटी रुपये मंजूर केले असून , सप्टेंबरच्या अखेरीस प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल.


No comments:
Post a Comment