पोलिसांवरील विश्वास उडालाय:सत्यपाल सिंह |
'गेल्या काही दिवसांतील घटनांमुळे मुंबईकरांचा पोलिसांवरील विश्वास उडाला आहे, हा विश्वास पुन्हा मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असेल,' असे प्रतिपादन मुंबईचे नवे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी केले.
मुंबईचे पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांच्या उचलबांगडीनंतर सत्यपाल सिंह यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आजच तातडीने मुंबईत येऊन पदभार स्वीकारला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सत्यपाल सिंह यांनी मुंबईकरांना सुरक्षित व शांत मुंबईचे आश्वासन दिले. 'मुंबई शहराचा पोलीस प्रमुख म्हणून नियुक्ती होणे हा माझ्यासाठी सन्मान असून या पदाच्या जबाबदारीची मला पूर्ण जाणीव आहे. मुंबई शहर सध्या एका कठीण परिस्थितीचा सामना करते आहे. शहरातला सामाजिक एकोपा बिघडला आहे. अशा काळात सरकारने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवेन, असे सत्यपाल म्हणाले. 'पोलिसांबद्दल लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह आहे. त्यांच्याबद्दलच्या विश्वासाल तडा गेला आहे. पोलिसांबद्दलचा विश्वास आणि सुरक्षेची भावना सर्वसामान्यांच्या मनात पुन्हा निर्माण करणे हे आपल्यासमोरचे आव्हान आहे, असे सांगून पोलिसांचे खच्ची झालेले मनोधैर्य वाढवितानाच पोलीस दलाला एक सशक्त, सक्षम आणि पारदर्शी नेतृत्व देण्याचा आपला प्रयत्न राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
'अरुप पटनायक यांच्या काळात स्थापन करण्यात आलेले स्पेशल स्कॉड बरखास्त करण्यात येणार असल्याचे सत्यपाल सिंह यांनी यावेळी सांगितले. 'यापुढे कुठलेही स्पेशल स्कॉड असणार नाही. त्याची काहीही गरज नाही. प्रत्येकाला नेमून दिलेली कामे प्रत्येकजण करेल,' असेही त्यांनी स्पष्ट केले.


No comments:
Post a Comment