‘पीपल्स’च्या होस्टेलचे वीज-पाणी तोडले; होस्टेल पाडण्याचा घाट
दलित चळवळींचे केंद्र राहिलेल्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन संस्थेच्या मुंबईतील सिद्धार्थ वसतिगृहाचा वीज आणि पाणीपुरवठा तोडण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी होस्टेल सोडून जावे म्हणून संस्थेने वीज-पाणी बिले थकवली असून यामागे होस्टेल पाडण्याचे कारस्थान असल्याचा आरोप वसतिगृह विद्यार्थी कृती समितीने केला आहे.
1964 मध्ये मुंबईतील वडाळा येथे सिद्धार्थ होस्टेलची इमारत उभी करण्यात आली. वडाळा येथील आंबेडकर आणि फोर्टच्या सिद्धार्थ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना 1985 पर्यंत येथे रीतसर प्रवेश देण्यात येत होता. या ठिकाणी 150 खोल्या असून 350 विद्यार्थी राहू शकतात. संस्थेने 9 लाख रुपयांचे बिल थकवल्यामुळे महावितरण आणि पालिकेने होस्टेलचा वीज, पाणीपुरवठा दोन आठवड्यांपूर्वी तोडला आहे. संस्थेने जाणीवपूर्वक वीज आणि पाण्याची बिले थकवली असून सिद्धार्थ होस्टेल पाडून तो भूखंड बिल्डरांना विकण्याचा ‘पीपल्स’च्या संचालकांचा डाव आहे, असा आरोप विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष दिलीप गायकवाड यांनी केला. आठ दिवसांमध्ये होस्टेलचा वीज आणि पाणीपुरवठा पूर्ववत केला नाही तर पीपल्स संस्थेवर मोर्चाने जाऊन उग्र आंदोलन करण्याचा इशारा या विद्यार्थ्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
रामदास आठवले, अरुण कांबळे, नामदेव ढसाळ, राजा ढाले, ज. वि. पवार, अर्जुन डांगळे असे कितीतरी नेते सिद्धार्थ होस्टेलमध्ये घडले. हे होस्टेल एकेकाळी दलित चळवळीचे केंद्र होते. आजही राज्यातील ग्रामीण भागातून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचा हे होस्टेल आसरा आहे.
आम्ही 1985 पासून होस्टेल बंद केले असून सध्या तेथे विद्यार्थी नव्हे तर गुंड राहतात, असे संस्थाचालकांचे म्हणणे आहे.


No comments:
Post a Comment