जकात खात्याच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढा
मुंबई - मुंबईतील जकात नाके सध्या भ्रष्टाचारामुळे बरबटले आहेत. तेथे दररोज खुलेआम कोट्यवधी रुपयांची जकातचोरी होते. या प्रकाराची दखल घेत जकात खात्याच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढण्याचे आदेश आज स्थायी समितीने पालिका प्रशासनाला दिले. स्थायी समितीच्या आज झालेल्या बैठकीत भाजप सदस्य कृष्णा पारकर यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करीत जकातचोरीकडे लक्ष वेधले. जकात चुकवून आलेल्या पाच गाड्या आज वांद्रे येथे पकडण्यात आल्या. या गाड्यांमध्ये सहा टन माल असताना केवळ दीड टनाची जकात भरून, त्या मुंबईत आल्या होत्या. पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार झाला आहे, असा आरोप त्यांनी केला.


No comments:
Post a Comment