मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वेने प्रवास करीत असताना दोन सेकं दांचा वेळ वाचविण्यासाठी मुंबईकर धडपडतात आणि मृत्यूला जवळ करतात. प्रवाशांची रेल्वे रूळ ओलांडण्याची मानसिकता बदलावी म्हणून रेल्वे, पोलीस प्रशासन प्रयत्न करतात, परंतु प्रवासी त्यांना ठेंगा दाखवतात. जानेवारी ते ऑगस्ट 2012 पर्यंत कुर्ला ते मुलुंड स्थानकांदरम्यान 336 जणांचा मृत्यू, तर 338 जण जखमी झाले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होऊ लागला आहे.
उपनगरीय रेल्वेखाली चिरडून, रेल्वेचा पोल लागून, रेल्वेलाइन क्रॉस करताना, रेल्वे प्लॅटफॉर्म आणि लोकलच्या मध्ये पडून मृत्यू होणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मध्य रेल्वेच्या सीएसटी ते कसारा-कर्जत-पनवेल आणि पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट-विरारपर्यंतच्या प्रवासादरम्यान दररोज सुमारे 15 ते 20 अपघात होतच असतात. त्यात पुरुष प्रवाशांची संख्या जास्त आहे. मध्य रेल्वे मार्गावर दादर, कुर्ला, ठाणे, डोंबिवली, कल्याण, वाशी तर पश्चिम रेल्वे मार्गावर मुंबई सेंट्रल, अंधेरी, बोरिवली या स्थानकांवर अपघातांची संख्या जास्त आहे. मध्य रेल्वेच्या कुर्ला ते मुलुंड स्थानकांदरम्यान आतापर्यंत 336 जणांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या वर्षी 475 जणांचा मृत्यू या स्थानकांदरम्यान झाला होता. काही मिनिटांचा वेळ वाचविण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडण्याच्या गडबडीत अनेक प्रवासी आपला जीव धोक्यात घालतात. रेल्वे प्रशासनाने पादचारी पुलांचा वापर करा, असे कितीही बजावून सांगितले तरी प्रवासी मात्र त्याला ठेंगा दाखवतात. अनेक वेळा अपघात कोणत्या रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये झाला हे निश्चित करेपर्यंत त्या जखमी प्रवाशाला उपचार मिळत नाहीत, तर बर्याचदा रेल्वे स्थानकात अँम्बुलन्स नसल्यामुळे जखमींना रुग्णालयात नेण्यास वेळ होतो. परिणामी रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडणार्यांची संख्या वाढतच आहे.


No comments:
Post a Comment