ग्रामीण भागात "पीपल्स" चा विस्तार करणार -रामदास आठवले
राज्याच्या ग्रामीण भागात पीपल्स एज्युकेशन संस्थेचा विस्तार करणार असल्याची ग्वाही पीपल्सचे नवनियुक्त अध्यक्ष आणि रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी बुधवारी दिली. आठवले यांनी फोर्ट येथील सिद्धार्थ महाविदय़ालयात आज जोरदार शक्ति प्रदर्शन करत संस्थेच्या अध्यक्षपदाची सूत्रे ग्रहण केली.
आठवले म्हणाले की, ‘आपण ‘पीपल्स’चे विद्यार्थी असून वडाळय़ाच्या सिद्धार्थ वसतिगृहात आपण घडलो आहोत. बाबासाहेबांनी पीपल्स संस्था काढल्यामुळेच माझा इथपर्यंतच प्रवास होऊ शकला. सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या धर्तीवर आपण पीपल्सचा विस्तार करणार करणार आहोत. राजकारण आणि शिक्षणसंस्था या दोन्ही बाबी पूर्णपणे भिन्न असून संस्थेत आपण कोणत्याही गटातटास थारा देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी 1945 पीपल्स एज्युकेशन संस्थेची स्थापना केली. आज या संस्थेची मुंबई, बंगळुरू, महाड, बोधगया, पंढरपूर, पुणे येथे महाविद्यालये असून 40 हजार विद्यार्थी या संस्थेत शिक्षण घेत आहेत.
गेली अनेक वर्षे या संस्थेच्या संचालक मंडळात वाद असून त्याबाबत उच्च न्यायालयात खटला सुरू आहे. भारिपचे अध्यक्ष आणि बाबासाहेबांचे नातू अँड. प्रकाश आंबेडकर आणि आठवले असे संचालक मंडळात दोन गट आहेत. 1 जून रोजी प्रकाश आंबेडकर यांनी पीपल्सचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा दोन्ही गटांमध्ये धुमश्चक्री होऊन 50 कार्यकर्ते जखमी झाले होते.यामुळे आज पोलिसांनी प्रचंड असा बंदोबस्त ठेवला होता
औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयाचा परिसर 181 एकरांचा असून त्यापैकी 20 एकर जागा औरंगाबाद महापालिकेने संस्थेला विश्वासात न घेता संपादित केली आहे. या जागेची भरपाई संस्थेला मिळण्यासाठी लवकरच न्यायालयात जाणार असल्याचे रामदास आठवले यांनी या वेळी सांगितले.


No comments:
Post a Comment