रिपाइंची मराठा हक्क परिषद
मुंबई - राज व उद्धव ठाकरे यांचे कौटुंबिक संबंध असले तरी राजचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष महायुतीमध्ये येण्याची शक्यता रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज फेटाळली. पक्षातर्फे 30 ऑक्टोबरला मुंबईत मराठा आरक्षण हक्क परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. आतापर्यंत दलित समाजामध्ये फूट पाडून सत्ता मिळविण्यात आली आहे. त्यामुळे यापुढील काळात आम्ही मराठा समाजामध्ये फूट पाडून सत्ता मिळवू, अशी घोषणा आठवले यांनी या वेळी केली.
मनसे हा पक्ष दलितांचा कैवार घेणारा नसल्याने त्यातील दलित तरुणांनी बाहेर पडावे, असा सल्ला त्यांनी दिला. इंदू मिलच्या जागेवर भव्य वाचनालय उभारण्याची सूचना राज यांनी केली आहे, त्यावर बोलताना इंदू मिलसोबत कोहिनूर मिलच्या जागेवरही वाचनालय उभारण्याची आवश्यकता आहे, असा टोला त्यांनी लगावला. मनसेच्या झेंड्यामध्ये असलेला निळा रंग जोपर्यंत मनामध्ये येत नाही, तोपर्यंत त्याला काहीच अर्थ नसल्याचे ते म्हणाले. मराठा समाजाला रिपब्लिकन पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी आठवले यांनी मराठा समाजाला 15 टक्के आरक्षण देण्याची मागणी केली. नोकरी व शिक्षणामध्ये हे आरक्षण द्यावे, असे ते म्हणाले.
रिपाइंच्या मराठा आघाडीची घोषणा त्यांनी आज पत्रकार परिषदेत केली. पक्षातर्फे 30 ऑक्टोबरला मुंबईत मराठा आरक्षण हक्क परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. राजकारणातील ठराविक मराठा घराण्यांची मक्तेदारी मोडून काढून मराठा समाजातील सर्वसामान्य तरुणांना राजकारणात संधी मिळण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. मराठा समाजाच्या मागण्यांकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. अर्जुन डांगळे, गौतम सोनावणे, पोपट घनवट, दत्ता पडवळ, भूषण जाधव, रचना देसाई, पंकज साळुंखे आदी या वेळी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment