बंदमुळे १२,५०० कोटी रुपयांचे नुकसान - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बंदमुळे १२,५०० कोटी रुपयांचे नुकसान

Share This
बंदमुळे १२,५०० कोटी रुपयांचे नुकसान
गुरुवारच्या भारत बंदमुळे देशाचे सुमारे १२,५०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजने (सीआयआय) व्यक्त केला आहे. केंद्र सरकारच्या रिटेल क्षेत्रामध्ये एफडीआयला मंजुरी देण्याच्या तसेच डिझेलच्या किमती वाढवण्याच्या निषेधार्थ भाजपाप्रणित रालोआ, डावे पक्ष व अन्य राजकीय पक्षांसह मालवाहतूकदारांनी आज देशव्यापी बंद पुकारला होता. देशभरात संमिश्र प्रतिसाद मिळालेल्या या बंदमुळे हजारो कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा उद्योजकांची संस्था असलेल्या सीआयआयने व्यक्त केला आहे.
देशाच्या बहुतेक भागामध्ये उद्योग-व्यापारासाठी प्रतिकूल परिस्थिती असल्याचे सीआयआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. या बंदमुळे नक्की किती रुपयाचे नुकसान झाले हे सांगणे शक्य नसले तरी हा आकडा १२,५०० कोटी रुपयांच्या आसपाल असल्याचा अंदाज सीआयआयने व्यक्त केला आहे.
देशाच्या विकासासाठी आर्थिक सुधारणा गरजेच्या असल्याने केंद्र सरकारने राजकीय विरोधकांच्या दबावाला बळी पडू नये आणि सुधारणांना अग्रक्रम द्यावा असे आवाहन सीआयआयने केले आहे. ज्यावेळी सुधारणांसाठी धाडसी पावले उचलली जातात त्यावेळी मोठ्या प्रमाणावर विरोध होतो, परंतु ९०च्या दशकामध्ये केलेल्या सुधारणांची फळे आपण आज बघत आहोत, त्यामुळे सुधारणा करणे महत्त्वाचे असल्याचेही सीआयआयने नमूद केले आहे. या सुधारणांमुळे अंतिमत: लोकांचाच फायदा होणार असल्याचे लोकांपर्यंत पोचवण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages