पाण्याच्या समन्यायी वाटपासाठी जनता आझाद मैदानात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 October 2012

पाण्याच्या समन्यायी वाटपासाठी जनता आझाद मैदानात


मुंबई : पाण्याचे समान वाटप झालेच पाहिजे, पाण्याच्या बाजारीकरणाचा धिक्कार असो, अशा घोषणा देत जलक्षेत्रात कार्यरत असणार्‍या शेकडो स्वयंसेवी संघटनांच्या प्रतिनिधींनी लोकभिमुख पाणी धोरण संघर्ष मंचच्या माध्यमातून ज्येष्ठ शेकाप नेते एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी आझाद मैदानावर तीव्र आंदोलन केले.

या वेळी पाणी चळवळीचे भारत पाटणकर, भालचंद्र कांगो, कॉ. प्रकाश रेड्डी, सोलापूरचे भाई शिवाजीराव पाटील आदी पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. जलनीती व जलकायद्यात बदल झालाच पाहिजे. पिण्यासाठी नंतर शेतीसाठी व सर्वात शेवटी उद्योगासाठी, असा क्रम लावत पाण्याचे समन्यायी वाटप झाले पाहिजे, असे एन. डी. पाटील यांनी या वेळी स्पष्ट केले.

उजनी धरणाचे पाणी फक्त 16 टक्केच शिल्लक आहे. धरणामध्ये प्रदूषित झालेल्या पाण्यामुळे मिथेन वायू तयार होऊन स्फोट घडण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे जर पिण्याचे पाणी प्रदूषित होऊन त्यात स्फोट झाल्यास रोगराईचे संकट उभे राहील, असे शिवाजीराव पाटील यांनी सांगितले.

मुंबईत अंबानीच्या पाच जणांच्या कुटुंबाला लाखो लीटर पाणी तर गिरणगावातील जनतेला दोन दोन दिवस पाण्याची वाट पाहावी लागते, असे चित्र आहे. आंतरराष्ट्रीय निकषानुसार प्रतिमाणसी 150 लीटर पाणी मिळाले पाहिजे. ते मिळत नाही. पाण्याचा विभाग खाजगीकरण करून पालिकेला नेमके काय साध्य करायचे आहे, असा सवाल, कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांनी या वेळी केला.

पाण्याचे बाजारीकरण थांबवावे, ग्रामीण व शहरी भागात शुद्ध पाणी द्यावे, समान वाटप, खोरेनिहाय जल व्यवस्थापन व्हावे, दुष्काळी भागाचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवावा, या व आदी मागण्यांचे निवेदन या वेळी शासनाला देण्यात आले. या वेळी राज्यभरातील पाणी चळवळीच्या कार्यकत्र्यांनी आपापल्या भागातील पाण्याची, जमिनीची, धरणाची, दुष्काळाची भयावह स्थिती सांगितली. शासनाने याबाबत गांभीर्याने विचार केला नाही तर यापुढचे आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा एन. डी. पाटील यांनी दिला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS