ग्राहक पंचायतीच्या भाववाढीविरोधात याचिकेत पार्टी बनणार - शरद राव - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ग्राहक पंचायतीच्या भाववाढीविरोधात याचिकेत पार्टी बनणार - शरद राव

Share This

मुंबई : मुंबईसह राज्यभरातील सर्व रिक्षा-टॅक्सीचालकांना मिळालेली भाडेवाढ ही मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियनमुळे मिळाली असल्याचे सांगत मुंबई ग्राहक पंचायतने दाखल केलेल्या याचिकेमध्ये युनियन 'पार्टी' होणार असल्याचे अध्यक्ष शरद राव यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. 

मुंबई ग्राहक पंचायतने मुंबई उच्च न्यायालयात या भाडेवाढीविरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. या जनहित याचिकेवर चलाखीने राज्य शासनाला पार्टी बनविण्यात आले आहे, मात्र मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियनला पार्टी बनविण्यात आले नाही. उच्च न्यायालयाने भाडेवाढ रोखण्यास नकार दिला आहे. मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियन ऑटो-रिक्षाचालक-मालकांचे हित अबाधित राखण्यासाठी येत्या 31 ऑक्टोबर रोजी होणार्‍या सुनावणीत पार्टी बनणार असल्याचे राव यांनी सांगितले.

बेकायदेशीर रिक्षा बंद करा 
मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात सुमारे 40 हजार रिक्षा बेकायदेशीररीत्या वाहतूक करीत आहेत. राज्य सरकारने संकेतस्थळावर जी आकडेवारी प्रसिद्ध केली आहे, त्यानुसार सुमारे 40 हजार रिक्षा बेकायदेशीर आहेत. त्यामुळे अशा बेकायदेशीर रिक्षांना आळा घालण्यासाठी अशा रिक्षांना सीएनजी मिळूच नये, अशी योजना मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियन समोर आणणार असल्याचे शरद राव यांनी सांगितले. व्हेईकल आयडेंटीफिकेशन कार्ड ज्यामध्ये विशेष बार कोड असेल व परमीटधारकांची संपूर्ण माहिती त्या कार्डवर असेल, असे कार्ड ऑटोरिक्षावर मीटरच्या बाजूला कायमस्वरूपी बसविण्यात यावे. ज्या वेळी रिक्षा सीएनजी भरण्यासाठी जाईल तेव्हा सेन्सरद्वारे व्हेईकल आयडेंटीफिकेशन कार्डची खात्री करूनच सीएनजी देण्यात यावा असे राव यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages