बेस्टच्या प्रवासाकडे प्रवाशांचा वाढता कल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्टच्या प्रवासाकडे प्रवाशांचा वाढता कल

Share This

मुंबई : रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ झाली, दरपत्रके आरटीओतर्फे देण्यात आली तरीसुद्धा आजही प्रवासी आणि रिक्षाचालकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. मैलाची पद्धत बंद करून त्याजागी मॅट्रिक टनची पद्धत आरटीओने अमलात आणली. प्रवाशांचा फायदा व्हावा, यासाठी ही पद्धत आरटीओने अमलात आणली असली तरी प्रवाशांमध्ये मात्र गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांनी सध्या बसचा किंवा पायी जाण्याचा मार्ग स्वीकारला आहे.

मुंबईत टॅक्सी-रिक्षांसाठी मैलाची पद्धत अस्तित्वात होती. ती ब्रिटिशकालीन होती. त्यामुळे ही मैलाची पद्धत बंद करून किलोमीटरची पद्धत राबविण्यात यावी, अशी शिफारस हकीम समितीने केली. त्यानुसार टॅक्सी-रिक्षांसाठी पहिला टप्पा जो 1.6 किमी (1 मैल)चा आहे, त्याऐवजी किमान भाडे अशी संकल्पना आरटीओने अमलात आणली आहे. त्याचबरोबर पुढच्या प्रत्येक टप्प्यासाठी 100 मीटर ग्राह्य धरण्यात आले आहे. त्यामुळे रिक्षाचे किमान भाडे आता 15 रुपये, तर टॅक्सीचे 19 रुपये झाले आहे. त्यापुढील प्रवासासाठी प्रवाशांना प्रत्येकी 10 मीटरप्रमाणे भाडे मोजावे लागणार आहे; परंतु 11 ऑक्टोबरपासून लागु करण्यात आलेल्या भाडेवाढीमुळे रिक्षा-टॅक्सींना भाडे मिळेनासे झाले आहे. किमान भाडे 15 आणि 19 देण्याऐवजी बेस्टच्या बसने प्रवास करताना प्रवासी दिसू लागले आहेत. त्यातच या भाडेवाढमुळे शेअर रिक्षा-टॅक्सीचे भाडेही मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. जेथे 7 रुपये शेअर रिक्षाला द्यावे लागायचे तेथ्ेा आता 10 रुपये द्यावे लागत आहेत. तर बेस्टची बस 5 रुपये घेते. वांद्रे, घाटकोपर, कुर्ला, दादर, चर्चगेट, सीएसटी अशा काही भागात शेअर रिक्षा-टॅक्सीसाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी दिसून यायची; परंतु सध्या प्रवाशांचा कल बसकडे वाढताना दिसत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages