"क्राय' संस्थेच्या सर्वेक्षणात उघड
मुंबई - 2015 पर्यंत शिक्षणातला लिंगभेद दूर करण्याचे आश्वासन 2000 सालच्या "वर्ल्ड एज्युकेशन डे फोरम'च्या माध्यमातून भारताने जगाला दिले होते. प्रत्यक्षात मात्र 2012 साल संपत आले असतानाही अनेक मुली शाळाबाह्य आहेत. मुलींच्या शिक्षणाकडे पाहण्याचा समाजाचा नकारात्मक दृष्टिकोन हे यामागचे प्रमुख कारण असल्याचे "क्राय' या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात उघडकीस आले आहे.देशातील 42 टक्के शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र शौचालये नाहीत, हेदेखील मुलींच्या शिक्षणातल्या गळतीचे एक प्रमुख कारण असल्याची माहिती क्रायच्या सीईओ पूजा मारवाह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शाळा घरापासून लांब असणे, स्वतंत्र शौचालयाचा अभाव, शाळेत जाण्यासाठी असणारी वाहतूक असुरक्षित आणि लवकर होणारा विवाह ही मुलींच्या गळतीची महत्त्वाची कारणे आहेत. "चाईल्ड राईटस ऍण्ड यू' अर्थात "क्राय' या संस्थेने नुकतेच याबाबत एक सर्वेक्षण केले आहे. "इच्छा' ही छायाचित्र मोहीमही क्रायने सुरू केली असून, त्याअंतर्गत संस्थेकडे आतापर्यंत सुमारे 1500 छायाचित्रे देशभरातून आली. या छायाचित्रांमध्ये शहर व गावातील मुली शाळाबाह्य असण्याची कारणे चित्रित करण्यात आली आहेत. ही छायाचित्रे सरकारी यंत्रणांना पाठवून त्यातून काही सकारात्मक बदल होतात का, हे पाहिले जाणार आहे. या मोहिमेसोबतच माहिती, दृष्टिकोन आणि कृती यावर आधारित देशातल्या सहा प्रमुख शहरांमधील झोपडपट्ट्यांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. त्यात सदर माहिती मिळाली असे पूजा मारवाह यांनी सांगितले.


No comments:
Post a Comment