इंदू मिलसाठी 29 नोव्हेंबरला रिपाइंच्या वतीने संसदेवर मोर्चा
मुंबई / जाधव प्रेस नेटवर्क
मुंबई- भाजप, शिवसेना रिपाइंच्या महायुतीमध्ये २०१४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मनसे’ला स्थान असणार नाही, अशी घोषणा ‘रिपाइं’चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी मंगळवारी पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीत केली.
वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी वांद्रे एम आय जी क्लब येथे मंगळवारी पक्षाच्या कार्यकारणीची बैठक पार पडली. त्यावेळी भारतीय संविधानाच्या मूलभूत चौकटीस हरताळ फासणा-या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर रिपाइं कदापि जाणार नाही. जे इंदु मिल आंदोलनाची हेटाळणी करत आहेत, परप्रांतीयांना धमकावत भारतीय संविधानालाच आव्हान देत आहेत, त्यांच्याशी आम्ही युती करु शकत नाही असे आठवले म्हणाले
धर्मचक्रप्रवर्तन दिनी म्हणजे 24 ऑक्टोबरपासून रिपाइंचे पक्ष सभासद नोंदणी अभियान राबविण्यात येणार असून पँथर चळवळीतील पहिला शहीद भागवत जाधव यांच्या स्मृतिदिनी म्हणजे 10 जानेवारी रोजी या अभियानाचा समारोप होणार आहे. या अभियानामध्ये 1 कोटी सभासदांची नोंदणी करण्याचा संकल्प आठवले यांनी यावेळी व्यक्त केला.
इंदू मिलसाठी 29 नोव्हेंबरला रिपाइंच्या वतीने संसदेवर मोर्चा काढण्यात येणार असून महाराष्ट्रात महायुती असली तरी राज्याबाहेर मात्र लोकसभेच्या स्वतंत्रपणे जागा लढवण्याचा निर्णय कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. महायुतीचे जागावाटप आणि किमान समान कार्यक्रमाबाबत आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशी लवकरच चर्चा करणार आहोत, अशी माहिती आठवले यांनी दिली. महायुतीचे जागावाटप लवकर होईल, त्यामुळे मतदारसंघाची बांधणी करण्यास रिपाइंला संधी मिळेल. बिगर दलित उमेदवारांना आगामी निवडणुकीत रिपाइंच्या वतीने मोठ्या संख्येने उमेदवारी देण्यात येईल, अशी माहिती आठवले यांनी दिली.


No comments:
Post a Comment