मुंबई : मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामात हलगर्जीपणा करणार्या अभियंत्यांवर दंडनीय कारवाई कायम राहणार असून अभियंत्यांबरोबर घेतलेल्या मीटिंगमध्ये जे अभियंते बाहेर पडले त्यांची वेतनश्रेणी रोखली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त असिम गुप्ता यांनी मंगळवारी सांगितले.
खड्डे बुजवण्याच्या कामात कामचुकारपणा करणार्या पालिका अभियंत्यांवर कारवाई करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असून कंत्राटदारांना दीड कोटींचा दंड ठोठावल्यानंतर अभियंत्यांवरही 90 लाख रुपयांचा दंड ठोठावत कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र हा आमचा दोष नसून पॉटहोल ट्रेकिंग सिस्टिमचा दोष असल्याचे अभियत्यांचे म्हणणे आहे. पॉटहोल ट्रेकिंग सिस्टिमद्वारे खड्डय़ांची समस्या समजल्यावर त्या समस्येचे निराकरण 48 तासांत करणे या अभियंत्यांना बंधनकारक होते. यानुसार वेळेत खड्डे न भरल्याने तसेच खड्डे बुजवण्यासाठी या सिस्टिमद्वारे हे रिपोर्टच संगणकावर तयार न केल्यामुळे ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला गेल्याचे गुप्ता यांनी सांगितले. दंड ठोठावताना अभियंत्यांनाही आपली बाजू मांडण्याची संधी मिळावी, यासाठी या अभियंत्यांबरोबर मीटिंग बोलावली होती. या मीटिंगमध्ये त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली होती, मात्र या मीटिंगमधून काही जणांनी नेतेगिरी करत 'वॉक आऊट' केले. तरीही त्यांना पुन्हा एक संधी देऊन त्यांचे वैयक्तकरीत्या म्हणणे ऐकल्यानंतर यामध्ये काहींचे म्हणणे योग्य वाटले तर त्यांचा दंड कमी होऊ शकतो, असे गुप्ता यांनी स्पष्ट केले.


No comments:
Post a Comment