जलसिंचनातील भ्रष्टाचार उघडकीस आणणारे ज्येष्ठ अधिकारी विजय पांढरे हे मनोरुग्ण नसून, देशभक्त आहेत. त्यांच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी पुण्यात दिला. पांढरे यांच्यावर या घोटाळ्यासंदर्भात राजकीय दबाव वाढत आहे, असेही ते म्हणाले.
राज्याच्या पाटबंधारे प्रकल्पात हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आणणारे विजय पांढरे यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पूर्ण पाठिंबा आहे, तो व्यक्त करण्यासाठी संघटनेने पुणे रेल्वे स्थानक ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान मंगळवारी मोर्चा काढला होता. पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरीही संघटनेचे सुमारे चारशे कार्यकर्ते रेल्वेस्थानकाजवळ जमा झाले होते. पोलिसांचा आदेश झुगारून त्यांनी मोर्चा काढला.
या वेळी शेट्टी म्हणाले की, राज्यातील अनेक मंत्री, नेते, पुढारी आणि काही अधिकारी हजारो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारात आणि घोटाळ्यांमध्ये अडकलेले आहेत. त्या सा-यांची सीबीआय चौकशी करावी. पांढरे यांनी अतिशय चांगले काम केले आहे, पण राष्ट्रवादीची मंडळीच त्यांना मनोरुग्ण ठरवण्याच्या प्रयत्नात आहेत, प्रत्यक्षात पांढरे हे देशभक्त असून आम्ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा पुनरुच्चारही शेट्टी यांनी केला. या वेळी विश्वंभर चौधरी, शेतकरी संघटनेचे सदूभाऊ खोत, आमदार विजय शिवतारे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


No comments:
Post a Comment