मुंबई- डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आमचे दैवत आहे. त्यांचे स्मारक इंदू मिलच्या जागेवर व्हावे ही दलित बांधवांची प्रामाणिक इच्छा आहे. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी (सहा डिसेंबर) रिपाइं (ए) इंदू मिलचा ताबा घेणार आहे, असे रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी म्हटले आहे. डॉ. आंबेडकर स्मारक हा केवळ रिपाइंचा लढा नसून भाजप पूर्ण ताकदीने यात उतरणार असल्याचे भाजपचे खासदार गोपीनाथ मुंडे यांनी म्हटले आहे.
गेल्या निवडणुकीत दलित मते आपल्यासोबत नसल्याने सत्तेपासून दूर राहावे लागले. मात्र, आता 2014 च्या निवडणुका रिपाइंच्या सहभामुळे महायुतीच जिंकणार यात शंका नाही, असा विश्वास भाजपचे संसदीय उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी रविववारी व्यक्त केला. समता परिषदेतर्फे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. महापालिकेचे सहआयुक्त शांताराम शिंदे यांना मुंडे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
रिपाइंचे नेते रामदास आठवले आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष राज पुरोहित यांची प्रमुख उपस्थिती होती. मुंडे म्हणाले की, आता आठवले यांना सत्तेपासून फार काळ दूर राहावे लागणार नाही. आज जरी ते खासदार नसले तरी आगामी काळात ते खासदार, आमदार आणि मंत्रीही करतील, असा चिमटाही मुंडे यांनी काढला. इंदू मिलच्या जागेसाठी रिपाइंने पुकारलेल्या आंदोलनाला शिवसेना नेते गैरहजर राहिल्याच्या मुद्द्यावर, या आंदोलनात भाजप सदैव रिपाइंच्या पाठीशी राहणार असल्याचा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला. तसेच भाजपची राज्यातील सर्व कार्यालये रिपाइंच्या कार्यकर्त्यांसाठी खुली राहतील, असेही त्यांनी सांगितले. परिषदेचे अध्यक्ष आमदार भाई ऊर्फ विजय गिरकर यांनी सूत्रसंचालन केले.


No comments:
Post a Comment