राज्य घटना, संसद व राजमुद्रा यांची विडंबनात्मक, आक्षेपार्ह व्यंगचित्रे काढल्याने प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या व्यंगचित्रकार असीम त्रिवेदी याची "बिग बॉस'मध्ये निवड झाल्याने संविधानप्रेमी व दलित जनतेमध्ये कलर्स वाहिनी विषयी तीव्र नाराजी पसरली असून, त्यांनी कलर्स वाहिनी विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
अण्णा हजारे यांच्या आंदोलनावेळी त्रिवेदीने वादग्रस्त व्यंगचित्रे काढली होती. त्यासाठी त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. नंतर सरकारने तो मागे घेतला होता. आता असीम त्रिवेदीला "बिग बॉस'मध्ये प्रवेश दिल्याने दलित समाज नाराज झाला आहे. दोन वर्षांपूर्वी रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांना 'बिग बॉस'मध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. घटनेचा अपमान करणाऱ्या त्रिवेदीला कलर्स वाहिनी विनाकारण महत्त्व देत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांमधून केला जात आहे. त्रिवेदीला "बिग बॉस'मधून बाहेर काढण्याची मागणी दलित समाजामध्ये जोर घेत आहे. अनेक कार्यकर्त्यांनी आठवलेंना पत्र पाठवून त्रिवेदीला या कार्यक्रमातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे. याबाबत कलर्स वाहिनीच्या प्रशासनासोबत येत्या दोन दिवसांमध्ये चर्चा करण्यात येणार असून, त्यानंतरही त्रिवेदीला "बिग बॉस'मधून न वगळल्यास कलर्स वाहिनीविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रिपाइंच्या वतीने दिला.
|


No comments:
Post a Comment