मुंबई : आझाद मैदानातील हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 58 आरोपींविरोधात शुक्रवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कनिष्ठ न्यायालयात जवळपास 3,384 पानी आरोपपत्र दाखल केले. आसाम आणि म्यानमार येथील दंगलीच्या निषेधार्थ रॅलीचे आयोजन करणार्या 'उलेमा बोर्ड'चे अध्यक्ष तथा मुस्लिम धर्मगुरू मौलाना अथार आणि 'रझा अकादमी'चे सचिव सईद नुरी यांच्यावरही आरोपपत्रात ठपका ठेवण्यात आला आहे. हिंसाचारप्रकरणी रझा अकादमीविरोधात थेट ठपका ठेवण्यात आला नसल्याचे वरिष्ठ पोलीस सूत्रांनी सांगितले.
आसाम आणि म्यानमार येथील दंगलीच्या निषेधार्थ 11 ऑगस्ट रोजी दक्षिण मुंबईत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला अचानक हिंसक स्वरूप मिळाले होते. त्या हिंसाचारात दोघा तरुणांचा बळी गेला, तर 44 पोलिसांसह 52 जण जखमी झाले होते. आंदोलनकत्र्यांनी पोलीस तसेच प्रसारमाध्यमांच्या व्हॅनसह अनेक खाजगी तसेच सरकारी गाडय़ांची तोडफोड केली होती. याप्रकरणी जवळपास तीन महिने तपास करत असलेल्या गुन्हे शाखेने शुक्रवारी 58 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले. याप्रकरणात 3,942 अज्ञात आरोपींविरोधात विविध कलमांतर्गत आरोप निश्चित करण्यात आले आहेत. त्यात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, कायदा-सुव्यवस्थेला अडथळा निर्माण करणे आदी प्रमुख आरोपांचा समावेश आहे. या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी एकूण 63 जणांना अटक केली. त्यातील 32 जणांना जामीन मंजूर झाला असून उर्वरित आरोपी तुरुंगात बंदिस्त आहेत. रॅलीदरम्यान भडकावू भाषण करणार्यांची अद्याप चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी सांगितले.


No comments:
Post a Comment