मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक होऊ नये, अशी मनोहर जोशी यांची इच्छा असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते नवाब यांनी आज केला. खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना मलिक यांनी जोशी यांच्यावर टीकास्त्र सोडले.
शिवसेनाप्रमुखांचे निधन होऊन आठवडा उलटला असताना त्यांच्या स्मारकावरून वाद उफाळला आहे. स्मारकावरून नाहक वाद नको, असे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले असले, तरी काही नेत्यांनी वेगवेगळी वक्तव्ये सुरूच ठेवली आहेत. शिवाजी पार्कवर बाळासाहेबांचे स्मारक उभारण्यात कायद्याची अडचण येऊ शकते, असे स्पष्ट झाले असले, तरी शिवसेना नेत्यांचा आग्रह कायम आहे.
शिवाजी पार्कवर बांधकाम करण्यास उच्च न्यायालयाचे निर्बंध असल्याने असे स्मारक उभारणे अशक्य असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वीच स्पष्ट केले; पण शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानाला आक्षेप घेत बाळासाहेबांचे स्मारक शिवाजी पार्कवरच होईल, असा पुनरुच्चार नाशिक येथे केला. ""आमची मागणी सरकारने मान्य करावी; अन्यथा शिवसेना आपल्या स्टाईलने स्मारक उभारेल,'' असा इशारा जोशी यांनी दिला. त्यावर प्रतिक्रिया देताना, ""बाळासोहबांचे स्मारक होऊच नये, अशी मनोहर जोशी यांची इच्छा आहे,'' असा टोला नवाब मलिक यांनी लगावला.
बाळासाहेबांच्या कर्तृत्वाचा सर्वांनाच आदर आहे. त्यामुळे त्यांचे यथोचित स्मारक व्हावे; पण सरकारशी चर्चा न करताच अशी विधाने करणे योग्य नाही. जोशी राज्याचे माजी मुख्यमंत्री असल्याने त्यांना कायदे आणि नियम चांगलेच माहीत आहेत. असे असताना शिवाजी पार्कचा आग्रह करून जोशीच स्मारकाच्या उभारणीत खोडा घालत आहेत.
नवाब मलिक; प्रदेश प्रवक्ते राष्ट्रवादी कॉंग्रेस
नवाब मलिक; प्रदेश प्रवक्ते राष्ट्रवादी कॉंग्रेस


No comments:
Post a Comment