मुंबई : मुंबईला दरदिवशी 3 हजार 460 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मात्र जुन्या आणि जीर्ण जलवाहिन्यांमधून होणारी पाण्याची गळती, जलवाहिन्यांच्या कॉकमधून होणारी पाण्याची चोरी आणि टँकर लॉबीकडे गांभीर्याने लक्ष दिल्यास मुंबईकरांना योग्य प्रमाणात पाणीपुरवठा उपलब्ध होईल. या प्रश्नांकडे लक्ष न दिल्यास भविष्यात परिस्थिती गंभीर होईल, असे ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या 'वेळ वाहून जात आहे ' या अहवालात म्हटले आहे.
पाण्याच्या वापराचा नकाशा, संस्थात्मक बदल, पुनर्वापर, पाण्याच्या दराचा पुनर्विचार, विकास नियोजन आणि विकास नियंत्रण नियम, पर्जन्य जलसंधारण असे 10 मुख्य आणि अत्यावश्यक सूचना या अहवालात करण्यात आल्या आहेत. पाणी गळतीकडे पालिका गांभीर्याने पाहत नसल्यामुळे दरदिवशी 700 दशलक्ष लिटर पाण्याची गळती होत आहे. मुंबईकरांमध्ये पाणी वाचवण्याची मानसिकता रुजवली पाहिजे. पावसाचे पाणी साठवण्याबाबतच्या उदासीनतेकडे लक्ष दिले पाहिजे, असे मत संस्थेचे धवल देसाई, वर्षा राज आणि सुधींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केले.


No comments:
Post a Comment