मुंबई- दहशतवादाचा धोका मुंबईलाच नव्हे, तर संपूर्ण जगाला आहे. मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पोलिस दलात अनेक बदल झाले आहेत. कोणत्याही आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी मुंबई पोलिस दल सज्ज आहे, अशी ग्वाही पोलिस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनी आज दिली.
दहशतवादी हल्ल्याचा सामना करण्यास पोलिस दल, दहशतवादविरोधी पथक (एटीएस), फोर्स वन, क्यूआरटी (शीघ्र प्रतिसाद पथक) आणि सेंट्रल क्यूआरटी (सेंट्रल क्विक रिस्पॉन्स टीम) सक्षम आहे, असे डॉ. सिंह म्हणाले. दहशतवादाचा वाढता धोका लक्षात घेऊन नव्या "सेल' निर्माण केल्या आहेत. या विभागांतील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. मुंबईतील कोणत्या संस्था, संघटना आणि महत्त्वाच्या ठिकाणांना दहशतवादी लक्ष्य करू शकतात, याबाबत आमच्याकडे माहिती आहे. त्यानुसार शहरात पोलिसांच्या "मॉक ड्रिल' घेतल्या जात आहेत. गुप्तवार्ता विभागही सतर्क आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
मुंबईत नाकाबंदी आणि "कोंबिंग ऑपरेशन' सुरू आहे. "सेकंड हॅण्ड' वाहनांचे विक्रेते तसेच सिम कार्ड विक्रेत्यांवर पोलिसांचे कडक लक्ष आहे. वाढत्या दहशतवादाबद्दल पोलिस दलांत राष्ट्रीय स्तरावर चर्चा होत आहे, असे त्यांनी सांगितले. मुंबईतील 400 शाळा आणि महाविद्यालयांत दहशतवादविरोधी जनजागृती कार्यक्रम घेतले आहेत, असे डॉ. सिंह म्हणाले.


No comments:
Post a Comment