शिवतीर्थ नामांतरास सर्व विरोधकांचा विरोध - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शिवतीर्थ नामांतरास सर्व विरोधकांचा विरोध

Share This
मुंबई : शिवाजी पार्कचे नाव बदलून 'शिवतीर्थ' असे ठेवण्यात यावे, अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी शिवसेनेच्या वतीने केली आहे, मात्र या मागणीस पालिकेतील सर्व विरोधी पक्षांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. 

शिवसेनेची ही मागणी सोमवारी होणार्‍या गटनेत्यांच्या बैठकीत चर्चेला येणार होती; परंतु गटनेत्यांची बैठक रद्द झाल्याने याबाबतचा विरोध सर्व विरोधी पक्षांनी पत्रकारांसमोर प्रदर्शित करत हे नामकरण कदापि करून दिले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यावर बोलताना मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी शिवसेना हे नामकरण करूच शकत नसल्याचे स्पष्ट केले आहे. कायद्याप्रमाणे 8 मे 2008चा ठराव क्र. 72 नुसार विद्यमान मैदाने अथवा उद्याने यांना देण्यात आलेली नावे पुन्हा बदलता येणार नाहीत, असा ठराव सेनेच्या सत्तेच्या काळातच झाललेला असताना शिवसेना ही मागणी करते हेच चुकीचे आहे. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्यदैवत आहे. 1927 साली महाराष्ट्राच्या मराठी अस्मितेचा आदर ठेवून हे नामांतर झाले होते. या मैदानास ऐतिहासिक महत्त्व आहे. शिवसेनाप्रमुखांना महाराष्ट्राचा, मुंबईचा विकास हवा होता. नामकरण करून विकास होणार आहे का? असा सवाल लांडे यांनी या वेळी केला. 

काँग्रेसचे नेते विरोधी पक्ष नेते ज्ञानराज निकम यांनीही शिवसेनेच्या या नामांतराच्या सूचनेस विरोध करत शिवाजी पार्कचे नामकरण 1927 साली काँग्रेस नगरसेविका अवंतिका गोखले यांनी केल्याचे स्मरण करून दिले. त्या वेळी ब्रिटिश सरकारने तो पारित केला होता. पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाची रॅली याच मैदानावर झाली होती. या ठिकाणी 1966 साली काँग्रेसचे बाळासाहेब देसाई यांनी लोकवर्गणीतून शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. या ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार हे मैदान आहे. शिवसेनेकडून शिवाजी महाराजांची अस्मिताच पुसण्याचा प्रयत्न केला जात असून गडगंज संपत्ती असल्याने स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्याचा हा सेनेचा प्रयत्न असल्याचा टोला निकम यांनी लगावला. शिवाजी पार्कचे नामांतर करायचे असेल तर छत्रपती हे बिरुद लावून 'छत्रपती शिवाजी महाराज पार्क' असे नामांतर करावे, असे निकम यांनी सांगितले. 

यावर बोलताना राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी ही शिवाजी पार्कच्या नामांतरास विरोध करत हे नामांतर म्हणजे शिवाजी महाराजांच्या नावाचा राजकारणासाठी वापर करून आता महाराजांच्याच नावास विरोध करणे सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवसेनेची पालिकेत सत्ता आहे; परंतु त्यांना विकासावर तोंड उघडण्यास जागा नसल्यानेच शिवसेनेकडून भावनिक मुद्दय़ांना हात लावून राजकारण केले जात असल्याचा आरोप पिसाळ यांनी केला, मात्र कायद्यापेक्षा भावना कधीही मोठी नसते. जर सेनेत बहुमताच्या जोरावर हा ठराव मंजूर केला तर आम्ही सनदशीर मार्गाने कोर्टात दाद मागू, असे पिसाळ यांनी स्पष्ट केले. भाजपा गटनेते दिलीप पटेल यांनी मात्र यावर सावध प्रतिक्रिया देत हा विषय तांत्रिक असेच भावनिक असल्यामुळे वरिष्ठांशी चर्चा करूनच भाजपा आपली बाजू मांडेल, असे स्पष्ट केले. दरम्यान, महापौर सुनील प्रभू यांनी मात्र शिवाजी पार्क हे नामकरण ब्रिटिशांच्या काळात झाले असल्याने ते बदलण्याचा पूर्ण हक्क असल्याचे सूचित करून बहुमताच्या जोरावर आम्ही हा ठराव मंजूर करू, असे स्पष्ट केले.
शिवाजी पार्क मैदानाचे महत्त्व 
1925ला ब्रिटिश सरकारच्या काळात शिवाजी पार्क बांधण्यात आले.
सन 1927 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माला 300 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधत माहिम पार्क या मैदानाचे 'शिवाजी पार्क' असे नामकरण करण्यात आले. 
स्वतंत्र भारतासाठी तसेच मुंबईच्या मागणीसाठी या मैदानातच मोठमोठय़ा सभा येऊन दिशा ठरवली गेली. 
सन 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापनासुद्धा याच शिवाजी पार्कमध्ये आली. 
सन 1965 मध्ये भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला त्या वेळी तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री तसेच संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत याच शिवाजी पार्कवर विजयी रॅली काढली गेली होती. 
माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी याच शिवाजी पार्कवर युती सरकारचा शपथविधी पार पाडला होता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages