मुंबई : महिलांवर होणार्या अन्याय, अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी सरकारने गांभीर्याने भूमिका घ्यावी, अशी मागणी करत 'वाघिणी' या सामाजिक संस्थेच्या वतीने गुरुवारी आझाद मैदानात तीव्र निदर्शने करण्यात आली.
'वाघिणी' व इतर विविध संघटनांनी दिल्ली येथील बसमधील बलात्काराच्या घटनेबद्दल मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी राजीनामा द्यावा, दिल्ली पोलीस आयुक्तांनी राजीनामा द्यावा, जलदगती न्यायालयाच्या माध्यमातून अशा घटनांना न्याय द्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या. या वेळी वाघिणीच्या अध्यक्षा ज्योती बडेकर म्हणाल्या, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त आहे, ते त्वरित भरावे व राज्यातील महिलांवरील झालेल्या अन्याय, अत्याचाराला वाचा फोडावी. या वेळी संस्थेच्या कार्याध्यक्ष पूनम गायकवाड म्हणाल्या, आपण पूर्वी यूपी, बिहार आदी राज्यांत गुन्हेगारीबाबत नावे ठेवत होतो, मात्र महाराष्ट्रातही तीच स्थिती आहे.
याबाबत सरकार गंभीर नाही. राज्य महिला आयोगावर अध्यक्षांची नेमणूक करण्यासाठी सरकार कोणतीच भूमिका घेत नाही. यावरून सरकारला महिलांची काळजी नाही, असा आरोप या वेळी त्यांनी केला. महिलांचे अगोदर रक्षण करा मगच त्यांना आरक्षण द्या, असेही ज्योती बडेकर यांनी सांगितले.


No comments:
Post a Comment