नव्याने १० हजार कोटींचे कर्ज काढणार
मुंबई - राज्यावर २ लाख ७० हजार कोटींचे कर्ज असून यंदाच्या वर्षी काढलेले ७ हजार ५८० कोटींचे कर्ज हे आधीच्या कर्जाची मुद्दल तसेच व्याज फेडण्यात गेले आहे. विशेष म्हणजे कॉंगे्रस व राष्ट्रवादीचे सरकार नव्याने १० हजार कोटींचे कर्ज काढणार असल्याची माहिती समोर आली आहे.
१ एप्रिल ते ३१ ऑक्टोबरपर्यंत राज्य सरकारने एकूण ७ हजार ५८० कोटींचे कर्ज काढले. त्यापैकी ७ हजार कोटींचे कर्ज पावणेनऊ टक्के दराने खुल्या बाजाराने काढले. तसेच नाबार्ड १८९ कोटी, तर राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून ८६ कोटींचे कर्ज काढण्यात आले आणि यासाठी १४ टक्के व्याज दर मोजण्यात आले. या वर्षी केंद्र सरकारकडूनही साडेनऊ टक्के दराने ३०३ कोटी कर्ज काढण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे सारे कर्ज आधीच्या कर्जाची मुद्दल व व्याज फेडण्यात गेल्याने विकासासाठी एकही पैसा तिजोरीत उरलेला नाही. परिणामी लवकरच कर्ज काढण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. यासाठी रिझर्व्ह बँकेच्या रोख्यांच्या लिलावातून चढ्या दराने हे कर्ज काढण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.
राज्यावरील कर्जाचा वाढता डोंगर पाहून कॉंगे्रस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हे सरकार महाराष्ट्र विकायला निघाले आहे. आता राज्यावरील कर्जाचीही श्वेतपत्रिका काढायला हवी. नक्की कर्जाचा पैसा कुठे झिरपत आहे हे लोकांसमोर यायला हवे, असे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी सांगितले.


No comments:
Post a Comment