मुंबई - आंबेडकरी चळवळीतील विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन सामाजिक एकोपा निर्माण करावा आणि समाजाचा विकास साधावा, असे आवाहन राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी आज येथे केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त परळ येथील बौद्धजन पंचायत समितीच्या सभागृहाजवळ बांधण्यात येणाऱ्या आंबेडकर स्मारकाचे आज भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
परळ, भोईवाडा येथे बाबासाहेबांचे भव्य सात मजली स्मारक उभारण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन करण्यात आले. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे लोकशाहीचे प्रमुख आधारस्तंभ असून त्यांच्या माध्यमातून सर्वांनी काम करण्याची आवश्यकता आहे. भगवान बुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वी त्याच पद्धतीने काम केल्याने त्यांचे आज जगभरात आदराने नाव घेतले जाते. बाबासाहेबांनी समाजपरिवर्तनाचे जे काम हाती घेतले, त्याचप्रमाणे त्यांचे नातू आनंदराज काम करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठीशी समाजाने खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. जातविरहित समाज निर्माण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. बाबासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असेही गायकवाड यांनी यावेळी सांगितले.


No comments:
Post a Comment