पत्रकारांवरील अन्यायाबाबत काटजू बोलत का नाहीत - विजय कुवळेकर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पत्रकारांवरील अन्यायाबाबत काटजू बोलत का नाहीत - विजय कुवळेकर

Share This
मुंबई : अभिनेता संजय दत्तबद्दल माफीच्या शिक्षेच्या प्रकरणावर बोलणारे प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष काटजू पत्रकारांवर होत असलेल्या अन्याय, अत्याचार व खुनाबद्दल का बोलत नाहीत, संपादकांवर आलेल्या हक्कभंगावर समिती नेमून याप्रकरणी का लक्ष घालत नाहीत, असे प्रश्न लोकमतचे मुख्य संपादक व माजी माहिती आयुक्त विजय कुवळेकर यांनी पत्रकार संघ येथे सोमवारी 'पत्रकारिता आजची व कालची' या वार्तालाप कार्यक्रमावेळी व्यक्त केले. 

या वेळी बोलताना कुवळेकर म्हणाले वर्तमानपत्राची गुणात्मक वाढ होणे अपेक्षित आहे. ऐश्‍वर्या-अभिषेक बच्चनच्या लग्नापेक्षा दुष्काळी भागात अर्भकाला पिण्यास पाणी नव्हते, ही बातमी त्या वेळी कुठेच नव्हती. विचारसुद्धा मुलभूत गरज आहे. विज्ञान तत्रज्ञानाच्या पत्रकारितेत तिचा विसर पडत चाललेला दिसतोय. तळागाळातील जनतेचे प्रश्न मांडण्याचे प्रमाणही कमी होतेय. जाहिरातीपेक्षा बातमीला स्थान देण्यात काही वर्तमानपत्रे आपली कर्तव्य विसरत चाललीय. कायमस्वरूपी पॅकेज देऊन वृत्तपत्रातील जागा खरेदी होतेय. २0१४ ते २0३४ च्या विकास आराखड्यात जनतेचा सहभाग दिसत नाही, आदी गोष्टीकडे लक्ष देत कुवळेकर यांनी पत्रकारितेची पदवी घेण्यापेक्षा त्या त्या वृत्तापत्राने त्यांच्या कर्मचार्‍याला प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न करावा असे मत व्यक्त केले. 

या वेळी बोलताना डॉ. बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे वृत्तपत्र विद्याप्रमुख जयदेव डोळे म्हणाले की, विविध पत्रकार संघटनांची जागा बेरक्या या संकेतस्थळाने घेतली आहे. सिटिझन र्जनालिस्ट हा प्रकार पत्रकारितेला धोक्याचा आहे. बातम्यांवर संस्कार करण्यात इलेक्ट्रॉनिक माध्यमे व प्रिण्ट माध्यमे कमी पडत आहे. संपादक निखिल वागळे व राजीव खांडेकर यांची पत्रकारितेची चौकट मोडल्यामुळे हक्कभंग ओढवून घेतला. आमदारांनी व पोलीस अधिकार्‍याने चूक केली, मात्र यांना चूक करण्याची गरज नव्हती. अंकुशाला उत मात होऊन चालत नाही. व्यवसायाची निवड म्हणून पत्रकारिता करणार्‍यांनीही लोकशाही पाळावी, असा सल्ला त्यांनी दिला. मोबाइल बाळगणारा पत्रकार बनायला लागलाय. त्याच्या मोबाइलहून येणार्‍या बातम्याचे फिल्टर न होता, मते घेणे योग्य आहे का असा प्रश्न उपस्थित करून तंत्रज्ञानाला विचार नसतो. तंत्रज्ञान ज्याच्या हाती असते त्याला विचार असावा लागतो असे डोळे म्हणाले.सदर वार्तालाप कार्यक्रमाला पत्रकार संघाचे अध्यक्ष देवदास मटाले, कार्यवाह विजयकुमार बांदल उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages