मुंबई : विधी समिती अध्यक्ष अँड़ मकरंद नार्वेकर यांना जकात दलालांकडून आलेल्या धमकीप्रकरणी गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा करण्याचे आश्वासन स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी मंगळवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत दिले होते. मात्र बुधवारी झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत नार्वेकर प्रकरणावर कोणतीही चर्चा झाली नसल्याने मुळात शिवसेना आपल्या सदस्यांबाबत किती गंभीर आहे, हे समोर आले आहे.
याबाबत बोलताना मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी शिवसेनेला नार्वेकर यांच्यावरील धमकीबाबत कोणतेही सोयरसुतक नसल्यानेच बुधवारी या विषयावर गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा झाली नसल्याचा आरोप केला. पालिकेत शिवसेनेची सत्ता असताना त्यांच्याच विधी समिती अध्यक्षांना जर जकात दलालांकडून धमकी येत असेल आणि याप्रकरणी सत्ताधारी शिवसेनेकडूनही कोणतीच दखल घेतली जात नसेल, तर ही दुर्दैवाची गोष्ट असल्याचे दिलीप लांडे यांनी सांगितले. दरम्यान, याबाबत महापौर सुनील प्रभू यांना विचारले असता त्यांनी नार्वेकरांना दिलेली धमकी ही दुर्दैवाची बाब असून याबाबत सभागृहात चर्चा झाली आहे, असे सांगितले. तसेच या धमकीप्रकरणी आपण स्वत: गृहमंत्री आर. आर. पाटील यांना पत्र लिहिणार असून प्रत्यक्ष भेटूनही चर्चा करू, अशी सारवासारव करीत महापौरांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.

No comments:
Post a Comment