मुंबई : पालिकेच्या माध्यमातून जनतेच्या पैशांचा वापर करणारे प्रशासनाचे अधिकारी सक्षम आणि प्रामाणिक नसल्यामुळे तसेच पालिकेतील शिवसेना नेत्यांकडून सर्वसामान्य नगरसेवकांच्या सूचनांचा विचार केला नसल्यामुळेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खड्डय़ांसंदर्भात दिलगिरी व्यक्त करावी लागली, असे प्रतिपादन शिवसेनेचे माजी स्थापत्य समिती (उपनगरे)चे अध्यक्ष मोहन लोकेगावकर यांनी केले आहे.
आपण सन २0११ मध्ये स्थापत्य समिती (उपनगरे) अध्यक्ष असताना तत्कालीन महापौरांनी तसेच सभागृह नेत्यांनी आपण केलेल्या सूचना ऐकल्या असत्या तर ही परिस्थिती उद्धव ठाकरेंवर आली नसती. मुंबईतील रस्त्यांवर पडणारे खड्डे, निकृष्ट डांबरीकरण, त्यावर सतत आणि क्षमतेबाहेर चालणारी वाहने तसेच रस्ते बांधकामाचा दर्जा इत्यादी बाबींचा विचार करून आपण रस्ते बांधणीचे काम निकृष्ट असल्याने प्रशासनाचे कान उपटले होते. त्या वेळी आपण तत्कालीन महापौर श्रद्धा जाधव तसेच तत्कालीन सभागृह नेते सुनील प्रभू यांच्यासमोर ही परिस्थिती अभ्यासपूर्वक मांडली होती. आपल्या म्हणण्याला विरोधकांनीही पुष्टी दिली होती, मात्र आपली ही कृती महापौर आणि सभागृह नेत्यांना न सुचल्याने आपल्याला पुढे बोलण्याची संधी दिली गेली नाही. त्या वेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनीही खडे बोल नगरसेवकांना तसेच महापौरांना सुनावले होते. पालिकेने त्या वेळी जनहिताच्या दृष्टीने आपल्या बोलण्याचा विचार केला असता तर आज उद्धव ठाकरे यांना दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली नसती, असेही लोकेगावकर शेवटी म्हणाले.

No comments:
Post a Comment