मुंबई : वाढत्या प्रदूषणात पर्यावरणाचे किती महत्त्व आहे, याबाबतचा विचार करून पालिकेकडून दरवर्षी वृक्षारोपण कार्यक्रम मोठय़ा प्रमाणात घेतले जातात. दर पाच वर्षांनी वृक्षगणना करण्याची प्रथा आहे, मात्र दीड वर्ष उलटूनही वृक्षगणना करण्याच्या दृष्टीने कोणतीही हालचाल सुरू असल्याचे दिसून येत नाही. केवळ एका कंपनीसाठी फेरनिविदेचा घाट सुरू असल्याचा आरोप शिवसेनेचे नामनिर्देशित नगरसेवक अवकाश जाधव यांनी केला आहे.
यंदा वृक्षगणनेसाठी तीन वेळा निविदा सूचना मागवण्यात आल्या होत्या. यापैकी दोन वेळा दरसूचीही उघडण्यात आली होती. या प्रक्रियेत नाहक दहा महिने वाया घालवण्यात आल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. नियमानुसार एफ वन संस्था पात्रता निकषांमध्ये अपात्र ठरल्यास एफ टू संस्थेस कार्यादेश देण्यात आला पाहिजे; परंतु असे न करता प्रशासनाकडून पुन्हा फेरनिविदा काढण्यात येत आहे. यामुळे आधीच झालेल्या विलंबामध्ये पालिका आणखी भर घालत असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. यातही जर एफ टू संस्थेचे दरपत्रक अधिक असेल तर त्या संस्थेला वाटाघाटीसाठी बोलवण्यात आले पाहिजे, असा नियम आहे. दरम्यान, वृक्षगणनेसाठी टेराकॉन इकोटेक प्रा. मार्फत पात्र नसलेल्या संस्थेबाबत वारंवार माहिती देण्यात येऊनही याबाबतची शहनिशा घेण्यासाठी पालिकेकडून अनेक महिन्यांचा कालावधी घेण्यात आला. तसेच पात्रतेच्या निकषामध्ये फेरबदल करून या संस्थेला पात्र ठरवण्यात आले आहे. संबंधित संस्था अपात्र आहे हे सिद्ध होऊनही पुन्हा निविदा सूचना का मागवण्यात येत आहे, असा सवाल जाधव यांनी उपस्थित केला आहे.

No comments:
Post a Comment