मुंबई : मुंबई महानगरपालिकेत ३ वर्षांनंतर अधिकार्यांची बदली करण्याचा नियम असताना राजकीय वरदहस्त आणि वरिष्ठांची चमचेगिरी करत सुमारे १४८ कर्मचारी, अधिकार्यांनी गेली अनेक वर्षे मलईदार असलेल्या त्याच जागेवर ठिय्या मांडत या नियमालाच हरताळ फासला आहे.
पालिकेतील इमारत प्रस्ताव, विकास नियोजन तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प ही खाते मलईदार खाती म्हणून परिचित आहेत. या तीन विभागांमध्ये १४८ कर्मचारी, अधिकार्यांचे अधिराज्य असून यांना आशीर्वाद देणार्या राजकीय नेत्यांची नावे जाहीर करा, अशी मागणी सुधार समितीत सपाचे नगरसेवक अशरफ आझमी यांनी केली. इमारत प्रस्ताव आणि विकास नियोजन या विभागांमध्ये कायम विकासांचा राबता असतो. ३ वर्षांनंतर बदलीचा नियम असताना विकास नियोजन विभागात ८७, इमारत प्रस्ताव विभागात ५६ अधिकारी, कर्मचार्यांनी वर्षानुवर्ष ठिय्या मांडला आहे. यामध्ये कार्यकारी अभियंते, सहाय्यक अभियंते, उपअभियंते, कनिष्ठ अभियंते, शिपाई यांचा समावेश आहे, तर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण विभागातही गेली अनेक वर्षे चार अधिकारी कार्यरत आहेत. हे अधिकारी, कर्मचारी आपली बदली टाळण्यासाठी अथवा पुन्हा मलईदार खाते मिळवण्यासाठी मंत्रालयात वशिला लागून आर्थिक व्यवहार करत आहेत. तसेच मलईदार खाती निवडत असल्याचा आरोप आझमी यांनी केला आहे.

No comments:
Post a Comment