मुंबई : वडाळ्यातील राम मंदिर येथे गेली ५९ वर्षे गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून, नवसाला पावणारा सोन्याचा गणपती म्हणून तो देशभरात ओळखला जातो. संपूर्णत: सोन्याचे सिंहासन हे या गणपतीचे वैशिष्ट्य असून सर्व स्तरातील लोकांसाठी गणपती विघ्नहर्ता ठरत असल्याचे सांगण्यात येते.
१९६५ पासून श्री द्वारकानाथ विद्याधर स्वामीजी मठ अर्थात राम मंदिर येथे गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. पुढल्या वर्षी हे गणेशोत्सव मंडळ ६0 व्या वर्षात पदार्पण करत असून महाराष्ट्रातील जनतेचं विघ्न दूर व्हावं असा नवस बोलल्याचे मंडळाचे कार्यकर्ते उल्हास कामथ यांनी स्पष्ट केले आहे. गणेशोत्सव काळातील ११ दिवस मुंबई, गोवा, कर्नाटक येथील भक्त स्वेच्छेने मंदिरात सेवा देण्यास उपस्थित असतात. शेकडो सेवकांच्या माध्यमातून दिवसभर हजारो भाविकांची सेवा केली जाते. मंदिरामध्ये प्रतिष्ठापना करण्यात येणार्या बाप्पाचे हात, मुकुट., कर्णभूषण, सिंहासन हे संपूर्णत: सोन्याचे आहे. दरवर्षी भाविकांच्या विविध देणग्यांमुळे गणपतीचे सुवर्णरूप आणखी उजळत चालले आहे. गेल्या वर्षी १ लाख १0 हजार भाविकांनी बाप्पाचे दर्शन घेतले होते. यंदा हा आकडा सव्वालाखावर जाण्याची शक्यता उल्हास कामथ यांनी व्यक्त केली. दर्शनाला येणार्या प्रत्येक भाविकासाठी अन्नपूर्णा उपक्रमातून महाप्रसादाची सोय करण्यात येते. त्याचप्रमाणे वर्षभर रामनवमी, दसरा, श्रावण, महालक्ष्मी व्रत, दुर्गा नमस्कार असे विविध आध्यात्मिक उपक्रम राबवण्यात येतात,तर सामाजिक उपक्रम म्हणून गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे काम मंडळाकंडून करण्यात येते, असेही कामथ यांनी स्पष्ट केले.

No comments:
Post a Comment