मुंबई - मुंबई सेंट्रल-बोरिवली दरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गाचे काम दोन वर्षापूर्वी सुरू करण्यात आले. या कालावधीत या कामावर अद्याप ३७३ कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र उर्वरित निधीअभावी या दोन्ही मार्गाचे काम रखडले आहे. या कामासाठी केंद्रीय रेल्वे विभागाकडून ९६५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. उर्वरित निधी मिळाल्यानंतर काम पूर्ण होण्यास आणखी दोन वर्षाचा कालावधी लागणार आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावरून दररोज ३२ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर पाचवा व सहावा मार्ग वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. या दोन वाढीव मार्गामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतुकीची समस्या सुटणार आहे. या कामासाठी केंद्रीय रेल्वे विभागाकडून ९६५ कोटी रुपये मंजूर झाले.
मार्चअखेपर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु आतापर्यंत फक्त ३७३ कोटी रुपये मिळाले असून, ते प्रकल्पावर खर्च करण्यात आले. उर्वरित रक्कम मिळाल्यानंतर येत्या दोन वर्षात काम पूर्ण होईल, असे वरिष्ठ अधिका-याने सांगितले. निधीअभावी काम रखडल्याने येत्या दोन वर्षात कामाच्या खर्चात वाढ होण्याची शक्यताही एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.

