मुंबई / प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वडाळा येथील सिद्धार्थ विहार वसतिगृहाला धोकादायक ठरवून पाडण्याचा डाव रचला जात आहे. एकदा का सिद्धार्थ विहार वसतिगृह पाडले कि या ठिकाणी बिल्डर आणि अनधिकृत बांधकाम होण्याची भीती असल्याने वसतिगृहाच्या पुनर्बांधणीचे लेखी आश्वासन दिल्या शिवाय वसतिगृह तोडू नये अशी भूमिका विद्यार्थी भारती, बुद्धिस्ट प्रेस कौन्सिल या संघटनांनी घेतली आहे.
सिद्धार्थ विहार वसतिगृह सात दिवसात खाली करण्याच्या नोटीसी बजावल्या नंतर त्वरित विद्यार्थी भारती, बुद्धिस्ट प्रेस कौन्सिल या संघटनांनी वसतिगृहाला भेट दिली. या इमारतीची डागडुजी केल्यास या इमारतिला आणखी १० ते १५ वर्षे कोणताही धोका पोहोचणार नाही असा निष्कर्ष काढण्यात आला. वसतिगृहाच्या इमारतीला वेळो वेळी डागडुजी केली असती तर आज अशी वेळ आली नसती, पीपल्स मधील वादामुळे वसतिगृहाची वाट लागली याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.
वसतीगृहामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या इच्छे प्रमाणे विद्यार्थी, बौद्ध भिक्षु, सामाजिक कार्यकर्ते राहत आहेत या सर्वांचे आधी एसआरए योजने प्रमाणे संक्रमण शिबीर बांधून पुनर्वसन करावे, दोन वर्षामध्ये वसतिगृह पुन्हा बांधले जाईल याची लेखी हमी पीपल्सने द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. पीपल्सच्या भूखंडावर अनधिकृत बांधकाम झाले असून अनधिकृत एसआरए योजना राबवण्यात येत आहेत वसतिगृह पाडल्यास या जागेवर अतिक्रमण होण्याची भीती या संघटनांनी व्यक्त केली आहे.

