मुंबई - राज्यातील दलित अत्याचारांच्या घटना आणि सरकारच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाने (आठवले गट) आज शहरात अनेक ठिकाणी रास्ता रोको आणि निदर्शने केली. वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालय, कांदिवलीतील अतिरिक्त पोलिस आयुक्त कार्यालय, मुलुंडमधील उपजिल्हाधिकारी कार्यालय, नागपाडा जंक्शन, मुंबई सेंट्रल, चेंबूर पांजरापोळ, पूर्व मुक्त मार्ग, घाटकोपर पश्चिम, विक्रोळी पार्कसाईट, दहिसर, साकीनाका जंक्शन आदी ठिकाणी रास्ता रोको आणि निदर्शने केली.
दलितांवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्य सरकार ठोस पावले उचलत नाही, ऍट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करत नाही, हे प्रकार रोखण्याची सरकारची इच्छाशक्ती नाही, असा आरोप पक्षाध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी केला. संबंधित सरकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांना या वेळी निवेदने देण्यात आली.
आठवले तीन गावांना भेट देणार पुण्यातील चिखली, जालन्यातील नाणेगाव आणि औरंगाबादमधील देवपूळ या तीन गावांना रामदास आठवले 13 मे रोजी भेट देऊन पीडितांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करणार आहेत. या प्रकरणांतील आरोपींना कडक शिक्षा करावी आणि असे प्रकार रोखण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.
हत्या झालेल्यांच्या कुटुंबांना मदत
मुंबई - जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील दलित समाजातील मनोज कसाब हा सरपंच व औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील उमेश आगळे यांच्या हत्येमुळे राज्यभरात दलित समाजात संतापाची लाट उसळली आहे. या दोघांच्या कुटुंबांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळातर्फे प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत नुकतीच देण्यात आली.महामंडळाचे अध्यक्ष रमेश कदम व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते त्यांना धनादेश देण्यात आले. आगळे यांची आई सावित्री आगळे यांना मोघे यांनी राज्य सरकारतर्फे चार लाखांचा धनादेश दिला.

