नारायण राणे, नितीन राऊत यांचे राजीनामे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नारायण राणे, नितीन राऊत यांचे राजीनामे

Share This
मोदी लाटेचा तडाखा महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीलाही बसल्यानंतर राज्य सरकारच्या गलबताला तडे जाऊ लागले आहेत. सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात चिरंजीव निलेश राणे यांचा पराभव झाल्यानंतर उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कडे पाठविला असून, जलसंधारण मंत्री नितीन राऊत यांनीही नागपूर लोकसभा मतदार संघात काँगेसचे विलास मुत्तेमवार यांचा पराभव झाल्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री चव्हाण यांच्यावरील राजीनाम्याचा दबाव वाढला आहे.
निलेश राणे यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी उघड बंड केले होते. राष्ट्रवादीबरोबर काँगेसच्या आमदारांनीही निलेश राणे यांच्याविरोधात काम केले. थेट शिवसेनेला मतदान करण्याचे आवाहन काँगेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले होते. यामुळे राणे संतापले होते. म्हणूनच निलेश राणे यांचा पराभव झाल्यानंतर राणे यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठविला. मंत्रिपदाबरोबर माझ्याकडील अन्य पदांचाही राजीनामा आपण देणार आहोत. मला आता सक्रिय राहायचे नाही, असे राणे यांनी सांगितले. दरम्यान, राणे, राऊत यांच्यानंतर काँगेसचे आणखीही काही मंत्री राजीनामा देण्याच्या पवित्र्यात आहेत.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीबद्दल नारायण राणे व नितिन राऊत यांनी अनेकदा मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी प्रकट केली आहे. उद्योग खात्याचे अनेक निर्णय मुख्यमंत्री कार्यालयात अडकल्याची राणे यांची तक्रार होती तर सरकारचे अनेक निर्णय सांगली, सातारा, सोलापूरकरिता (सांसासो) असतात, अशी तक्रार नितीन राऊत करीत आले आहेत. त्यामुळे या दोघांचा राजीनामा हा मुख्यमंत्र्यांवरील राजीनाम्याचा दबाव वाढवण्याची खेळी असल्याची चर्चा आहे.

'नैतिक जबाबदारी स्वीकारतो'
लोकसभा निवडणुकीचे निकाल अनपेक्षित असून राज्यातील काँगेस पक्षाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी मी स्वीकारली आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निकालानंतर व्यक्त केली. अनेक कल्याणकारी योजना यूपीए सरकारने राबविल्या परंतु अपेक्षित यश मिळाले नाही, असेही ते म्हणाले.

'सरकार बरखास्तीची मागणी अयोग्य'
मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला मिळलेला कौल आम्ही स्वीकारला असून, त्याबद्दल मोदी यांचे आपण पक्षातर्फे अभिनंदन करतो. तथापि, राज्यातील काँग्रेस आघाडी सरकार बरखास्त करण्याच्या राज्य भाजपच्या मागणीला काही अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages