मोदींच्या तुफानाने भाजपला ताकद; सेनेला संजीवनी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मोदींच्या तुफानाने भाजपला ताकद; सेनेला संजीवनी

Share This

मुंबईतील उत्तर, उत्तर मध्य व उत्तर पूर्व मुंबई या तीन लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार काँग्रेसच्या विरोधात प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. संपूर्ण देशात जे चित्र आहे, तोच कौल मुंबईने दिला. खरे तर मुंबई शहरात भाजपची ताकद ही कायम मर्यादित स्वरूपाची होती. कायम शिवसेनेच्या कुबड्यांवर चालणाऱ्या भाजपला मुंबईवर फारसे वर्चस्व कधीच गाजवता आले नव्हते. मात्र नरेंद्र मोदींच्या तुफानाने मुंबई शहरात केवळ भाजपचीच नव्हे, तर बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर कमकुवत झालेल्या शिवसेनेलाही नवसंजीवनी दिली आहे.
मुंबईमधील भाजप लढवत असलेल्या मतदारसंघांमध्ये गेल्या निवडणुकीत मनसेने मते फोडल्याने भाजपाचे सर्व उमेदवार पराभूत झाले होते. त्यातही उत्तर मुंबई हा प्रिया दत्त यांचा मतदारसंघ म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा. या मतदारसंघात भाजपचा एकही उमेदवार निवडणूक लढविण्यासाठीही तयार होत नसे. या मतदारसंघात दिवंगत प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांच्यावर दीड लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने विजय मिळवणे हे काँग्रेसचे पूर्ण पानीपत झाल्याचेच द्योतक आहे. उत्तर मुंबई हा गुजराती बहुल मतदारसंघ असल्यामुळे या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार यंदाच्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी होणार यात कुणालाही शंका नव्हती. त्याप्रमाणेच गोपाळ शेट्टी यांनी काँग्रेसच्या संजय निरुपम यांचा दारूण पराभव केला. तसेच किरीट सोमय्या यांच्या उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघातही गुजराती समाजाची मते मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांचाही विजय सुकर समजला जात होता. अपेक्षेप्रमाणे गोपाळ शेट्टी साडेतीन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी झाले. मात्र किरीट सोमय्या यांच्या मतदारसंघात गुजराती विरुद्ध मराठी असा वाद पेटला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पाटील यांची हातातून गेलेली जागा लढतीत आल्याचे चित्र सुरुवातीचा काही काळ तयार झाले होते. मात्र मोदी लाटेत कोण मराठी व कुठला गुजराती काहीच चालेनासे झाले. मोदी एके मोदी असेच मतदारांच्या मनात असल्याने किरीट सोमय्यादेखील लाखांच्या फरकाने जिंकून आले. या तिन्ही ठिकाणी भाजपाने काँग्रेसला पूर्णपणे चारी मुंड्या चीत केले आहे.

भाजप-शिवसेनेतच सत्तेची स्पर्धा
या विजयाने भाजपाच्या गोटात आनंदाचे तर काँग्रेसच्या गोटात सुतकाचे वातावरण होणे स्वाभाविक आहे. मात्र त्याहीपेक्षा महाराष्ट्रात व विशेषतः मुंबईत काँग्रेसला पुन्हा उभारी देईल, असे नेतृत्व आज तरी काँग्रेस पक्षाकडे दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुंबई शहरात फारसा जनाधार कधीच नव्हता. त्यांचे जे काही तीन आमदार मुंबईत जिंकून येतात, ते प्रामुख्याने स्वतःच्या कामावरच येतात. त्यामुळे त्या पक्षाचा मुंबईत कोणताही जनाधार नाहीच. थोडाफार राज ठाकरे यांचा जनाधार या शहरात होता, तोही साफ झाला असून मुंबईमध्ये भाजापच्या जागा प्रचंड मताधिक्याने आल्यामुळे आता पुढील काळातील सत्तेची स्पर्धा ही भाजप व शिवसेनेत होण्याचीच शक्यता अधिक आहे.

भाजपाने नव्या दमाच्या आशिष शेलार यांना मुंबईचे अध्यक्षपद दिले होते. त्यांनी नरेंद्र मोदींच्या सभा यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली त्याचेही हे फळ आहे, असे नमूद करावेच लागेल. नरेंद्र मोदींच्या करिष्म्या बरोबरच भाजप लढवत असलेल्या या तीन मतदारसंघांमध्ये घरोघरी जाऊन प्रचार करण्यात भाजप कुठेही कमी पडली नाही. भाजपच्या मुंबईतील या विजयामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील जागावाटपात भाजप मोठा वाटा मागणार यातही कोणतीही शंका नाही. मुंबईतील मराठी-गुजराती मतांचा भाजपाला फायदा झालाच. मात्र उत्तर भारतीय, पंजाबी, सिंधी, दक्षिण भारतीय, अशा सर्व समाजघटकांनी त्यांना मतदान केले. कुठल्या समाजाने किती मतदान केले व कुणी किती मते कापली हे सर्वसाधारण निवडणुकीतील विश्लेषण या निवडणुकीत लागू न पडणारे असल्याचेच भाजपाच्या लाखांच्या विजयाने सिद्ध केले असून मुंबईतील विधानसभेच्या ३६ जागांवरही काँग्रेसचे पानीपत करण्यासाठी भाजपा कार्यकर्ते जोरात मैदानात उतरतील यात शंका नाही.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages