तर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मतदान करणार नाही - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 May 2014

तर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मतदान करणार नाही

मुंबई/जेपीएन न्यूज: म्हाडाकडे अर्ज केलेल्या सर्व गिरणी कामगार व वारसदारांना पुनर्वसनासाठी मोफत घरे देण्याचे नवे धोरण त्वरित जाहीर करावे, अन्यथा लाखो गिरणी कामगार व त्यांचे कुटुंबीय आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मतदान करणार नाही, असा निर्वाणीचा इशारा गिरणी कामगार एकजूट संघटनेने दिला आहे. गिरणी कामगारांचे पुनर्वसन आणि न्याय मिळावा, या मागण्यांसाठी गिरणी कामगार व कुटुंबीय ३१ मार्च रोजी प्रदेश काँग्रेस मुख्यालयावर मोर्चा काढणार आहेत. गिरणी कामगार एकजूट संघटनेने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
१६व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल नुकताच लागला. देशातील कामगार, कष्टकरी, ग्रामीण भागातील शेतकरी आणि समाजातील इतर घटकांनी यूपीए सरकारच्या विरोधातील असंतोष मतदानातून व्यक्त केला. राज्य सरकारच्या धोरणाने उद्धवस्त झालेल्या गिरणी कामगारांच्या माथी पूर्वी ७.५0 लाख रुपये व आता सेंच्युरी मिल आणि इतर गिरण्यांमध्ये मिळणार्‍या घरांचा दर तब्बल १८ लाख रुपये ठेवण्यात आला आहे. लॉटरी पद्धतीने ही घरे देण्यात येणार आहे. म्हणजे एक प्रकारची ही कामगारांची फसवणूक करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप गिरणी कामगार एकजूट संघटनेने केला आहे. केंद्रातील मोदीप्रणीत भाजपा सरकारनेही गिरणी कामगारांची प्रतारणा केली तर त्यांचीही गत काँग्रेससारखी होईल, असा इशारा गिरणी कामगार एकजूट संघटनेने दिला आहे. दादर येथील वीर कोतवाल गार्डन येथून दुपारी तीन वाजता हा मोर्चा निघणार आहे. सर्व गिरणी कामगार व कुटुंबीयांनी या मोर्चात सहभागी होऊन आपले सार्मथ्य काँग्रेस पक्षाला दाखवून द्यावे, असे आवाहन एकजूट संघटनेने केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS